कळव्यात रेतीबंदर खाडीत अनोळखीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:15 IST2019-01-27T23:06:29+5:302019-01-27T23:15:51+5:30
गळयावर आणि पोटावर चॉपरने वार केल्याच्या खूणा असलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कळवा पोलिसांना गुरुवारी खाडीमध्ये मिळाला आहे. हा मृतदेह कोणाचा आणि त्याचा खून कोणी केला याचा तपास करणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.

मारहाण करुन चॉपरने केले वार
ठाणे: कळवा, रेतीबंदर खाडीत एका ४० ते ५० वयोगटातील अनोळखीचा मृतदेह २४ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्याच्या गळयावर आणि पोटावर चाकूने वार केल्याच्या खूणा असल्याने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या मृतदेहाच्या एका हातावर बजरंग बलीचे चित्र गोंदविण्यात आलेले आहे. तर डाव्या हाताच्या हाताच्या करंगळीत पितळेची अंगठी आहे. त्याला तीन दिवसांपूर्वीच प्रचंड मारहाण करुन चाकूचे वार करुन कुठल्यातरी खाडीत फेकले असावे. हा मृतदेह कळवा खाडीकडे वाहत आल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने तो बाहेर काढल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले. त्याची ओळख पटविण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच त्याचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, याचा उलगडा होण्यासाठी तीन पथकांची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.