दिलासादायक! ठाण्याची पाणी कपात रद्द,  मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा होणार पूर्ववत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:48 PM2020-08-18T20:48:29+5:302020-08-18T20:50:29+5:30

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता

Water cut in Thane canceled, water supply from Mumbai Municipal Corporation will be restored | दिलासादायक! ठाण्याची पाणी कपात रद्द,  मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा होणार पूर्ववत 

दिलासादायक! ठाण्याची पाणी कपात रद्द,  मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा होणार पूर्ववत 

googlenewsNext

ठाणे -  गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता ठाण्यावर निर्माण झालेले पाणी कापतीचे संकट टळले आहे . त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाण्याच्या काही भागात झालेली पाणी कपात रद्द होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली असून मुंबई महापालिकेकडून एकूण होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळणार असून ठाण्याचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता परिणामी भविष्यातील गरज ओळखून मुबई महापालिकेने २० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता.  या कपातीमुळे ठाण्यातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली होती. मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला  दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र मुंबई महापालिकेनेच  त्यांच्या क्षेत्रात २० टक्के पाणी कपात केली असल्याने ठाण्याला मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये १३ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्यामुळे  ठाण्याला ५ ऑगस्ट पासून केवळ ५२ एमएलडीच पाणी पुरवठा होता. 

 गेल्या दीड आठवड्यपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता पाणी कपातीचे संकट दूर झाले असून  गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी  पाणी कपात रद्द होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांना मात्र उत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.  ठाण्यातील या भागात होणार पाणी पुरवठा पूर्ववत ...  मुंबई महापालिकेकडून ठाण्याला दररोज ६५  एमएलडी पाणीपुरवठा होत असला तरी,शहरातील मोजक्या भागांना हा पाणी पुरवठा होत असून यामध्ये नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी, गावंदेवी, जांभळी नाका,खारकर आळी, स्टेशन रोड,लुईसवाडी, अंबिका नगर, हाजुरी,या भागांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर  या सर्व भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र आता हा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होणार आहे. 

" पूर्वी धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने मुंबई महापालिकेने पाणी कपात केल्याने ठाण्याला १३ एमएलडी कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होता.आता धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पत्र देण्यात आले असून त्यांनी ते मान्य केले आहे. परिणामी आता ठाणे महापालिका हद्दीत पाणी कपात नाही."                                   - विनोद पवार , उपनगर अभियंता , पाणी पुरवठा विभाग, ठा.म.पा                               

Web Title: Water cut in Thane canceled, water supply from Mumbai Municipal Corporation will be restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.