वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; रात्री घरी न परतल्याने कुटुंब होते चिंताग्रस्त
By अभिनय खोपडे | Updated: March 1, 2023 13:14 IST2023-03-01T13:13:55+5:302023-03-01T13:14:32+5:30
बुधवारी सकाळी धाडी शेत शिवारामध्ये त्यांना अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; रात्री घरी न परतल्याने कुटुंब होते चिंताग्रस्त
आष्टी ( वर्धा)- मंगळवारी सकाळी शेतात गेलेला शेतकरी रात्री घरी परत न आल्याने कुटुंबियांसह लोकांनी शोध घेतला असता आज सकाळी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील धाडी येथील वामन मडावी (५२) हे शेतात गेले होते. रात्र होऊनही घरी आले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी व गावकऱ्यातील २० ते २५ लोकांनी रात्रभर शेत शिवारामध्ये पाहणी केली. पण, ते आढळून आले नाही.
दरम्यान, बुधवारी सकाळी धाडी शेत शिवारामध्ये त्यांना अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात ते ठार झाले असावे अशी शक्यता आहे. घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.