शहरालगतच्या ग्रा.पं.मध्ये सोलर पार्कची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:10 IST2019-08-23T22:09:25+5:302019-08-23T22:10:12+5:30
ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते.

शहरालगतच्या ग्रा.पं.मध्ये सोलर पार्कची निर्मिती करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त राज्य सरकारने सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केला आहे. या विकास आराखड्यातून विविध विकासकामे होत असून शहरालगतच्या ग्रामपंचायतचे विद्युत देयक लक्षात घेता त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सोलर पार्कची निर्मिती करण्यात यावी, तसेच याचा समावेशही या विकास आराखड्यात करावा, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वर्धा शहरालगत नालवाडी, सेवाग्राम, पवनार, बोरगाव, वरुड, सिंदी (मेघे), पिपरी (मेघे),आलोडी, सालोड (हिरापूर), उमरी (मेघे), म्हसाला, सावंगी, आलोडी, साटोडा ही गावे आहेत. या भागात शहराचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे या ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते. विजेचे देयक वारेमाप येत असल्याने ते भरण्याची आर्थिक तजवीज ग्रामपंचायत नसते परिणामी अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होण्याची ग्रामपंचायतवर नामुष्की येते. वर्धा ही गांधी व विनोबांची कर्मभूमी असल्याने देशी विदेशी पर्यटक नेहमीच येथे येत असतात. महात्मा गांधींनी खेड्यांना स्वयंपूर्ण करण्यासह पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे. यासर्व बाबींचा विचार करुन शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये सोलर पार्कची निर्मिती करावी तसेच सेवाग्राम येथे ५ मेगाव्हॅटचा सोलरपार्क निर्माण करण्यात यावा. त्याकरिता १० एकर जागा आणि १० कोटी रुपयांची तरतूद सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करावी, असेही आमदार डॉ.पकंज भोयर यांनी निवेदनात नमूद केले आहे.