सराफा बंदमुळे कामगारांची उपासमार
By admin | Published: April 11, 2016 02:19 AM2016-04-11T02:19:21+5:302016-04-11T02:19:21+5:30
केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सराफा व्यावसायिकांवर एक्साईज ड्युटी उत्पादन शुल्क लादले.
४० दिवसांपासून व्यवहार ठप्प : बाजारपेठेसह शहरवासीयांना फटका
पुलगाव : केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सराफा व्यावसायिकांवर एक्साईज ड्युटी उत्पादन शुल्क लादले. दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर पॅन कार्डची सक्ती करण्यात आली. शिवाय अनेक कर व जाचक अटी लादल्या. याविरूद्ध देशातील सराफा असोसिएशनच्या आवाहनानुसार शहरातील सुवर्णकार व सराफा असोसिएशनने ४० दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला. शहरातील बाजारपेठ व नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. सराफा व्यवसायातील कामगार व कारागिरांवर उपासमारीचे सावट पसरले आहे.
शनिवारी सायंकाळी सराफा असो.द्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजण ढोमणे, किशोर बदनोरे, संदीप ढोमणे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहर व परिसरात जवळपास ४० सराफा व्यावसायिक असून अनेक कारागिर व कामगार या व्यवसायाशी जुळलेले आहेत. या सर्वावर निर्भर असलेल्या जवळपास २५० परिवारांची आर्थिक कोंडी झाली आहे. काही कारागिर व कामगारांना उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागत असल्याचेही दिसून येत आहे.
केंद्र शासनाकडे आमच्या राष्ट्रीय संघटनेने वारंवार निवेदन देऊन हा फायदा व जाचक अटी मागे घ्याव्या, अशी मागणी केली; पण शासन सराफा व्यावसायिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या बेमुदत बंदमुळे व्यवसायावर तर परिणाम झालाच; पण शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. सोबतच लग्न समारंभांचा काळ असल्याने ग्राहकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बंदमुळे बाजारपेठेती लाखो रुपयांच्या उलाढालीवरही विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनाच्या पुढील भूमिकेबद्दल माहिती देताना ‘कमल का फुल, हमारी भूल’ म्हणत २५१ सदस्यांनी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ शपथपत्रासह भाजपा सदस्यत्वाचे राजीनामे जिल्हा अध्यक्षाकडे सादर केले आहेत. पूढे साखळी उपोषण, पुलगाव बंद, आमरण उपोषण आदी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय शहरातील काँग्रेस, शिवसेनेसह विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळाल्याचेही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यासत आले.
यावेळी प्रवीण बदनोरे, प्रकाश काळे, सुधीर बांगरे, राजा बैतुले, अजय बन्नोरे, विजय कावळे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील सराफा व्यावसायिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
सराफा असोसिएशनच्यावतीने गत ४० दिवसांपासून बेमुदत बंद पाळला जात आहे. यात फळ, भाजीपाला विकण्यापासून रास्तारोको व साखळी उपोषण आदी आंदोलने करण्यात आली. वैभव घडे, संजय डोमाडे, आनंद मुनोत व कोठारी यांनी चार दिवस आमरण उपोषण केले. शनिवारी उपोषण मागे घेत सायंकाळी ७ वाजता सराफ लाईन परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. बाजार ओळीतील विविध मार्गाने फिरून परत सराफ लाईन येथे कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. कॅन्डल मार्चमध्ये वर्धा जिल्हा सराफा असोसिएशनचे पदाधिकारी, कारागीर व कामगार आपल्या कुटुंबातील सदस्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खासदारांनी भेट देत जाणून घेतल्या समस्या
सराफा असोसिएशनच्यावतीने गत ४० दिवसांपासून बेमुदत बंद पाळला जात आहे. दरम्यान, पुलगाव येथील सराफा व्यावसायिकांकडूनही विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. सराफा व्यावसायिकांनी साखळी उपोषणही केले. सराफा व्यावसायिकांच्या आंदोलन मंडपाला खासदार रामदास तडस यांनी भेट देत सराफा असोसिएशनच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय सराफा व्यावसायिकांच्या भावना शासन दरबारी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.