श्याम गायकवाड यांनी अखेरच्या श्वासानंतरही जपला समाजसेवेचा वसा
By Admin | Published: April 11, 2016 02:14 AM2016-04-11T02:14:53+5:302016-04-11T02:14:53+5:30
अख्खे आयुष्य समाजकार्यात झोकून मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्याम गायकवाड या कफल्लक लोकनेत्याने देहदान करून अखेरच्या श्वासानंतरही समाजसेवेचा वसा जपला.
देहदानाचा संकल्प पूर्ण : साश्रुनयनांंनी चाहत्यांचा लोकनेत्याला निरोप
वर्धा : अख्खे आयुष्य समाजकार्यात झोकून मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्याम गायकवाड या कफल्लक लोकनेत्याने देहदान करून अखेरच्या श्वासानंतरही समाजसेवेचा वसा जपला. केवळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पारिवारिक सदस्य म्हणून प्रत्येकाला विश्वासाचे वाटणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपाने हिरावल्याची सल वर्धेकरांच्या मनात कायम बोचत राहिल, अशा वेदना रविवारी नागरिकांकडून त्यांच्या अंत्ययात्रेत व्यक्त होत होत्या. त्यांचा मृतदेह सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपूर्द करण्यात आला.
पिपरी (मेघे) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख श्याम गायकवाड यांचे शनिवारी रात्री नागपूर येथील रुग्णालयात आजाराने निधन झाले. साऱ्यांचा आवडता श्यामभाऊ गेल्याची बातमी कानी येताच चाहत्यांनी त्यांच्या स्वागत कॉलनी येथील निवासस्थानाकडे धाव घेतली. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नागपूर येथून वर्धेत आणण्यात आला. त्या काळापासूनच त्यांच्या निवासस्थानी गर्दी होती.
रविवारी सकाळी त्यांच्या अंत्यदर्शनाकरिता अनेकांनी गर्दी केली होती. जो-तो त्यांच्या आठवणी सांगत असल्याचे दिसून आले. श्यामभाऊवर राष्ट्रसंतांच्या विचारांचा पगडा असल्याने त्यांच्या पार्थिवाजवळ राष्ट्रसंतांचे भजन सुरू असल्याचे दिसून आले. त्यांना घरून सामूदायिक प्रार्थनेने निरोप देण्यात आला. यानंतर त्यांची अंत्ययात्रा एका स्वर्गरथातून निघाली. ‘श्यामभाऊ अमर रहे’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा आर्वी नाका परिसरात पोहोचली. तेथे काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. येथून त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या कार्याच्या शुभारंभाची ओळख ठरलेल्या शिवाजी चौकात आली. तिथे त्यांच्या कार्यालयासमोर वर्धा शहरातील व जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. येथून पार्थिव घेऊन निघालेले वाहन थेट सेवाग्राम रुग्णालयात पोहोचले. येथे शोकसभा घेऊन मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला.
तत्पूर्वी, त्यांचे निवासस्थान गाठत खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, अतुल तराळे, जि.प. सदस्य अविनाश देव, वर्धा न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रवीण हिवरे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ. पवन भांदककर, गर्जना संघटनेचे महेश ठाकूर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, भाजपाचे प्रशांत बुरले, पिपरी (मेघे) येथील सरपंच कुमूद लाजुरकर यांच्यासह अनेकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी चौक येथील त्यांच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, भारत चौधरी, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ, प्रमोद राऊत यांच्यासह वर्धा न.प.चे नगरसेवक बंटी वैद्य, प्रफुल्ल शर्मासह राजकीय व सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सेवग्राम येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू बकाने, प्रशांत कुत्तरमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
वंचितांची दिवाळी करणारे श्यामभाऊ
दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ बनत असतात; मात्र काही असे परिवार आहेत, ज्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी चौकात वंचितांची दिवाळी हा उपक्रम सुरू केला. येथे गरजवंतांना रवा व साखर वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांनी राबविला होता.
सामूहिक विवाहाला दिली ओळख
वर्धा जिल्ह्यात आर्वी वगळता कुठेही सामूहिक विवाह होत नव्हते. या सामूहिक विवाहाची खरी ओळख त्यांनी लोकसेवा मंचच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून दिली. त्याची गरज त्यांनी पटवून दिली होती.