व्हीआयपी मार्गावरील वाहतूक असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:23 IST2019-08-02T23:22:40+5:302019-08-02T23:23:04+5:30
व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

व्हीआयपी मार्गावरील वाहतूक असुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
विश्रामगृहाशेजारून गेलेल्या, आर्वी मार्गाला जोडणाऱ्या व्हीआयपी मार्गावर खड्डयांनी जाळे विणल्याने येथून वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रात्री रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत होत्या. बहुप्रतिक्षित या मार्गाच्या सिमेंटीकरणाला मंजुरी मिळाली असून काम मागील काही महिन्यांपासून प्रगतिपथावर आहे.
रस्त्याचे काही प्रमाणात सिमेंटीकरण झाले असून रहदारीदेखील सुरू झाली आहे. रस्त्यावर उन्हाळ्यात पाणी जिरावे याकरिता पोती टाकण्यात आली होती. पावसाळा सुरू असतानादेखील ती पोती रस्त्यावरच असून अनेक ठिकाणी जमा झाल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून कुजल्यामुळे या परिसरातील वातावरण दुर्गंधीमय झाले आहे. दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत या मार्गावर मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थानेही याच परिसरात आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पोत्यांमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याचाच वाहनचालकांना भास होतो. पोत्यांवरून वाहने अडखळत असून दररोज किरकोळ असपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याचे पुढील काम सुरू असून संबंधित कंत्राटदाराला ही पोती उचलण्याचा विसर पडला आहे. यामुळे वाहनचालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरील पोती तत्काळ उचलण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक, वाहनचालकांतून होत आहे.
विकासकामांत नियोजनाचा अभाव
शहरात विविध ठिकाणी युद्धपातळीवर विकासकामे सुरू आहेत. मात्र, नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. कुठे वीजखांब, रोहित्र न हलविताच रस्त्याचे काम सुरू आहेत. तर कुठे काम झाल्यावरही रस्त्यावर बांधकाम व तत्सम साहित्य पडून आहे. याशिवाय कामांचा दर्जा म्हणावा तसा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा याकडे कानाडोळा आहे. अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून सर्वत्र गडबड घोटाळा सुरू आहे. विकासकामे सोईची ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरताना दिसून येत असून नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.