जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरणार
By admin | Published: April 10, 2016 02:33 AM2016-04-10T02:33:57+5:302016-04-10T02:33:57+5:30
जिल्ह्यातील अनेक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयात कामांचा खोळंबा होत आहे.
खासदारांची माहिती : महसूल मंत्र्यांचे सचिवांना निर्देश
वर्धा : जिल्ह्यातील अनेक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयात कामांचा खोळंबा होत आहे. याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई येथे निवेदनाद्वारे दिली. यावर त्वरित कार्यवाही करीत वर्धा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरण्याकरिता महसूल सचिवांना त्यांनी निर्देश दिल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरिता अनेक उपाययोजना शासनाने तयार केल्या आहेत. परंतु नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने त्यांची अंमलबजावणी करणे कठीण जात आहे. नागरिकांच्या अनेक कामांचा खोळंबा होतो. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे शक्य होत नाही. याची दखल घेत खा. तडस यांनी महसूल मंत्री ना. एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. येत्या काही दिवसात नायब तहसीलदारांची पदे रिक्त भरण्यात येतील व नागरिकांना मोठी सुविधा होऊन शासनाच्या योजना शेतकरीवर्गापर्यंत पोहोचण्यास हाथभार लागेल असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला. लवकरच ही पदे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)