वॉटर कप स्पर्धा आणि जलशुक्त शिवारची पाहणी
By admin | Published: May 6, 2017 12:32 AM2017-05-06T00:32:12+5:302017-05-06T00:32:12+5:30
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची
वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी यावेळी खा. रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. पंकज भोयर, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी आमदार दादाराव केचे, सरपंच वर्षा धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री साधत आहे. वॉटरशेडच्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करण्यासाठी माथा ते पायथा काम सुरू आहे. निसर्गाकडून घेतलेले निसर्गाला परत करण्यासाठी सावंगी पोळ या आदिवासी बहुल गावातील गावकरी जी मेहनत घेत आहे, त्यावरून पुढील ५० वर्षे यागावात दुष्काळ येणार नाही. मित्र म्हणून सरकार तुमच्यासोबत आहे. परिवर्तन घडत निसर्गाशी सर्वांची मैत्री झाली असून त्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आपल्या देशात अनेक संस्कृती व सभ्यता संपल्या आहेत. मात्र आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आदिवासी समाजाने निसर्गाचे शोषण नव्हे तर रक्षण केले आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वॉटर कप स्पर्धेत काम करणारे सर्वच नायक असल्यचे ते म्हणाले. यावेळी पाणी फाउंडेशनचे मंदार देशपांडे व उपस्थितांनी जल है तो कल है, दुष्काळाला लाथ मारा, असे नारे देऊन वातावरण जोशमय केले. जलसंधारणाच्या कामात योगदान देणाऱ्या दिलासा संस्थेचे रवींद्र तांदळकर, आर्ट आॅफ लिव्हींगचे मनीष बदे, मनीष भाटे रोटरी क्लब नागपूर, बजाज फाउंडेशन मार्फत महेंद्र फाटे, रोटरीचे डॉ. सचिन पावडे, ग्रामविकास अधिकारी बोबडे यांच्यासह विरुळ सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्यांचे बाळ असताना काम केले त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर पांदण रस्ते माहिती पुस्तीकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आर्वी तालुक्यातील पुनर्वसित १७ गावातील ४,४०० सातबारा तयार झाले असून त्यात प्रतिनिधिक स्वरुपात विनोद खांडेकर (नेरी), भीमराव तुमस्कर, भावराव कोरे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
वॉटर कपमधून पाच लाख घनमीटर
पाण्याच्या निचऱ्याची अपेक्षा
वॉटर कप स्पर्धेत ८ एप्रिल ते ४ मे २०१७ या २७ दिवसात १ लाख ७५ हजार घनमीटर पाणीसाठा होईल एवढी कामे झाली असून ५ मे ते २२ मे या कालावधीत होणाऱ्या कामातून ५ लाख घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या कामातुन ४५ हजार मनुष्य दिवस काम अपेक्षित आहे. यशोदा नदी खोरे पुनरुज्जीवन अंतर्गत ६३० किलोमीटर सरळीकरण व खोलीकरण होणार आहे. याचा फायदा ४ तालुक्यातील १४३ गावातील २८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे.