वसई-विरारच्या विकासासाठी मस्तवाल सत्ताधाऱ्यांना खाली खेचू
By admin | Published: June 9, 2015 10:20 PM2015-06-09T22:20:32+5:302015-06-09T22:20:32+5:30
भ्रष्टाचारी मस्तवाल सत्ताधाऱ्यांना खाली खेचल्याशिवाय इथला शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी केले.
वसई : विरार महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना जोरदारपणे मैदानात उतरली असून भ्रष्टाचारी मस्तवाल सत्ताधाऱ्यांना खाली खेचल्याशिवाय इथला शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी नालासोपारा येथील धानीव येथील प्रचारसेभेत बोलताना केले.
तरे सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविताना म्हणाले की, गेली कित्येक वर्षे सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या पैशावर मज्जा मारली आणि वसई-विरारकरांना पाणी, रस्ते, सार्वजनिक शौचालय, गटारे आदी मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले. परंतु यासर्व सोयीसुविधा महापालिकेत सत्ता आल्यावर शिवसेना पूर्ण करील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भागात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार घरोघरी मतदारांच्या गाठी-भेटी घेत आहेत. त्याला देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. यावेळी प्रचारसभेला शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत म्हणाले की, वसई-विरारच्या विकासासाठी शिवसेना हेच उत्तर आहे. महापालिकेवर युतीची सत्ता आल्यास सर्व सोयींनी परिपूर्ण देखणे शहर बनविण्याकरीता युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी नागरिकांनी रहावे, असे आवाहन त्यांनी प्रचारसभेत केले. यावेळी प्रचारसभेला उत्तर भारतीय प्रादेशिक प्रमुख राधेश्याम पाठक, उत्तर भारतीय जिल्हा प्रमुख गुलाब दुबे, उपजिल्हाधिकारी नवीन दुबे, आमदार अशोक पाटील, पालघरसह संपर्कप्रमुख केतन पाटील, तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, विभागप्रमुख राजेंद्र घरत, पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती ठाकरे यासह शिवसेना उमेदवार संजय महेतो, सुरेखा धनगर, सुरेखा माळवी, धनंजय मोहिते, शरद गावकर, वृषाली वैती, शिल्पा मेस्त्री, भाजप उमेदवार संजय पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)