वसईत भाजपाला ‘दे धक्का’; ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांचा सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:26 AM2019-01-03T00:26:23+5:302019-01-03T00:26:34+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाने वसईत महापालिकेतून २९ गावे वगळण्याबाबत शपथपत्र देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

Vasayet BJP gives 'push'; Decision to dislodge Christian office bearers | वसईत भाजपाला ‘दे धक्का’; ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांचा सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

वसईत भाजपाला ‘दे धक्का’; ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांचा सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

Next

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाने वसईत महापालिकेतून २९ गावे वगळण्याबाबत शपथपत्र देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, निवडणूक जिंकताच त्यांना त्याचा विसर पडल्यामुळे बुधवारी वसईतील भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाºयांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातून गावे वगळण्याच्या मुद्यावर तालुक्यात अनेक आंदोलने झालीत. वसईकरांना पोलिसांचा लाठीमारही सहन करावा लागला. तुरुंगवासही भोगावा लागला. याच मुद्यावर विधानसभा निवडणुका जिंकून विवेक पंडीत आमदार झाले आणि याच मुद्यावर त्यांचा दारूण पराभवही झाला. त्यानंतरच्या काळात अनेक आंदोलनकर्ते आपल्या अस्तित्वाची लढाई लढत विविध पक्षात सामिल झाले. काहींनी स्वतंत्रपणे दबाव गट तयार केला, वेगळ्या संघटना स्थापन केल्या. अशा अनेक उलथापालथी गेल्या काही वर्षात वसईच्या राजकारणात घडल्या आहेत.
खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची पोटनिवडणूक मे २०१८ ला घेण्यात आली. त्यावेळी प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दोन सभा वसई-नालासोपारा येथे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरारमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी फडणवीस यांनी २९ गावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत अनुकूल शपथपत्र देतो असे आश्वासनाचे गाजर वसईकरांना दाखवले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले.
निवडणुकीच्या आठ महिन्यानंतरही गावे वगळण्याच्या मुद्दा कायम असल्यामुळे आता वसईतील भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाºयांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रिक्सन तुस्कानो, अल्पसंख्याक अध्यक्ष विजय तुस्कानो, वॉर्ड अध्यक्ष डेरिक डाबरे,जिल्हा युवा चिटणीस स्टीफन परेरा, आगाशीचे वॉर्ड अध्यक्ष राबर्ट लोपीस, विभाग प्रमुख डेव्हिक मच्याडो, आल्फेड मच्याडो यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे.

मिलिंद खानोलकर सेनेच्या वाटेवर इतर पदाधिकारीही नाराज
जनआंदोलन समितीतून त्यावेळी असलेले मिलिंद खानोलकर यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहिर करून ते जनआंदोलन समितीतून बाहेर पडले. ‘मी वसईकर’ अभियानामार्फत स्वत:चे अस्तित्व टिकवत ते वसईच्या राजकारण व समाजकारणात पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांना २९ गावे पालिकेतून वगळण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी केली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येईल असे सांगितल्यानंतरही न्यायालयीन प्रक्रि या सुरू झालेली नाही. आठ महिने उलटूनही मुख्यमंत्र्यांनी वसईकर मतदारांना दिलेल्या आश्वासनाबाबत शासनाच्यावतीने ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची खंत त्यांनी लोकमतकडे बोलून दाखवली.

आम्ही भाजपा सोडला नाही मात्र, मुख्यमंत्र्यांनी वसईकरांना दिलेले वचन पाळावे. २९ गावे पालिकेतून वगळावी हिच आमची मागणी आहे.
- विजय तुस्कानो,
अल्पसंख्याक अध्यक्ष, भाजपा

वसईकरांच्या गावे वाचवा लढ्याचे मुख्यमंत्री स्व:ता साक्षीदार आहेत. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी विधीमंडळात या लढ्याचे समर्थन केले होते. त्यांनी तात्काळ आपल्या स्तरावर पावले उचलावीत. -मिलिंद खानोलकर,
‘मी वसईकर’ अभियान

२९ गावाचा तिढा सोडविण्यासाठी जो पक्ष आम्हाला सहकार्य करील, त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. ग्रामीण २१ हजार मतदार आमच्यासोबत आहेत.
- रिक्सन तुस्कानो,
भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव

Web Title: Vasayet BJP gives 'push'; Decision to dislodge Christian office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा