रोहयोचा वार्षिक आराखडा ठरविण्यात आता मजूरांचा सहभाग
By admin | Published: December 20, 2014 12:59 AM2014-12-20T00:59:35+5:302014-12-20T00:59:35+5:30
प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबाविण्यात येणार.
वाशिम : मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर अंदाजपत्रक तथा वार्षिक कृती आराखडा आता मजुरांच्या सहभागातून तयार केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३५१ पंचायत समित्यांपैकी १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबाविण्यात येणार आहे.
रोजगाराच्या शोधात भटकंती करणार्या मजूरांना त्यांच्याच परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये दरवर्षी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत मजूर अंदाजपत्रक तथा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येतो. आजवर संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी कार्यालयात बसूनच हे आराखडे तयार करायचे, त्यामुळे प्रत्यक्षात ग्रामस्थांना कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे आहे, या बाबीचा विचार यामध्ये होत नसे. मजूरांचेही अभिप्राय घेण्यात येत नसत. याचा परिणाम योजनेवर होत होता. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी मोठय़ा प्रमाणात शिल्लक असूनही कामे घेण्यासाठी आवश्यक उत्सुकता दिसून येत नव्हती. शिवाय मजूरदेखील कामाप्रती उदासीनच दिसत होते. याला आळा घालून या योजनेतून अधिकाधिक कामे व्हावी, जास्तीत जास्त मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने मजूर अंदाजपत्रक व वार्षिक कृती आराखडा तयार करताना त्यामध्ये मजूरांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३५१ पंचायत समित्यांपैकी १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.