Lok Sabha Election 2019 : समाजातील गठ्ठा ‘वोटींग’साठी उमेदवारांची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:02 PM2019-04-02T14:02:23+5:302019-04-02T14:03:09+5:30

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे.

 Lok Sabha Election 2019: Candidates' struggle for getting votes of society! | Lok Sabha Election 2019 : समाजातील गठ्ठा ‘वोटींग’साठी उमेदवारांची धडपड!

Lok Sabha Election 2019 : समाजातील गठ्ठा ‘वोटींग’साठी उमेदवारांची धडपड!

Next

- सुनील काकडे  
वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने ४१ ‘डिग्री सेल्सीयस’च्या कडक उन्हात मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढत मतदारांचे उंबरठे झिजवून मतांची खैरात मागितली जात असल्याचे दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी यांनी २००९ आणि त्यानंतर २०१४ मध्ये वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजयश्री मिळवत खासदारकीचा बहुमान पटकाविला. अर्थात दोन्हीवेळा पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांची भक्कम साथ आणि गवळी ज्या मराठा-कुणबी समाजाच्या आहेत, त्या समाजासोबतच बंजारा व अन्य समाजातील मतदारांचेही त्यांना पाठबळ मिळाले. त्यामुळेच भावना गवळी यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे हरिसिंह राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी; तर २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचेच शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला. दोन्हीवेळा भावना गवळी यांना दमदार मताधिक्य मिळाले. असे असताना त्यांनी गेल्या १० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत मतदारसंघात खासदारकी उपभोगताना पदाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळेच यवतमाळातील चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिममधील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांचा आलेख कमालीचा खालावला आहे. त्यांच्याच मराठा-कुणबी समाजात बेरोजगारांची भली मोठी फौज तयार झालेली आहे. केवळ लग्नसोहळे आणि मरणधरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जमणार नाही; तर बदलत्या काळासोबत स्वत:तही बदल घडवून विकासकामांच्या जोरावर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलावा लागणार, मतदारांच्या मुलभूत गरजा जाणून त्या पूर्ण करण्यासाठी काम करावे लागणार, याकडे भावना गवळी यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्यासमोर खडतर आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याचा सामना त्या कशाप्रकारे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
एकाच समाजाच्या दोन उमेदवारांमुळे तगडी ‘फाईट’!
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या कडव्या आव्हानांसमोर गारद झालेल्या काँग्रेसकडून यंदा वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीत उतरलेले माणिकराव ठाकरे हे देखील मराठा-कुणबी समाजाचेच असून त्यांनीही अन्य समाजातील मतदारांसोबतच दोन्ही जिल्ह्यांमधील मराठ्यांच्या गावांकडे प्रामुख्याने आपला मोर्चा सद्या वळविला आहे. खासदारकीच्या ‘हॅटट्रीक’वर असलेल्या भावना गवळींचा वारू रोखण्याचे मोठे आव्हान माणिकरावांना पेलावे लागणार आहे. त्यात ते कशापद्धतीने यशस्वी ठरतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या तथा एकाच समाजाच्या या दोन उमेदवारांमुळे मराठा समाजातील मतांचे विभाजन होणार असून तगडी ‘फाईट’ होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा सूर आहे.
बंजारा समाजाची निर्णायक मते कुणाकडे?
भाजपात वलय निर्माण करूनही उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंजारा समाजाचे पी.बी. आडे यांनीही प्रामुख्याने आपल्या समाजातील ‘गठ्ठा’ मतांवर एकहाती ‘कब्जा’ मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. अर्थात समाजातील प्रतिष्ठित मंडळी आडे यांच्या बाजूने असल्याने बंजारा समाजाची निर्णायक समजली जाणारी मते आडे शेवटपर्यंत अडवून ठेवतील, अशी खमंग चर्चा होत आहे.

Web Title:  Lok Sabha Election 2019: Candidates' struggle for getting votes of society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.