केंद्रीय पथकाने १५ मिनिटात उरकला पाहणी दौरा
By admin | Published: December 16, 2014 12:10 AM2014-12-16T00:10:35+5:302014-12-16T00:10:35+5:30
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त इरळा गावाची पहाणी.
मालेगाव (वाशिम) : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी राज्यात दाखल झाले. जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथक मालेगाव तालुक्यातील इरळा गावात रात्री ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले. रात्रीच्या वेळी गाड्यांच्या प्रकाशातच केंद्रीय पथकाने पाहणी दौरा अवघ्या १५ मिनिटामध्ये आटोपला.
यावर्षीच्या कोरड्या दुष्काळाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. संकटात अडकलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देण्यापूर्वी केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवार, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा दौर्यावर येणार होते. मालेगाव तालुक्यातील इरळा येथे या पथकाकडून पाहणी दौरा व शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यात येणार होत्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजतापासूनच पथक कधी येणार, याची प्रतीक्षा सुरू होती. इरळा परिसरातील शेतकरी बहुसंख्येने गावात जमले होते. जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्यांचा ताफाही तैनात होता. अखेर रात्री ७ वाजताच्या सुमारास पथकाचे आगमन झाले. इरळा येथील सत्यनारायण लाहोटी यांच्या शेतात जाऊन पथकातील सदस्यांनी सोयाबीन व तूर पिकाची माहिती घेतली. या पथकात सिन्हा, विभागीय कृषी आयुक्त सरदार, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, तहसीलदार जे.आर. विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण आदींचा समावेश होता. पथक गावात येताच शेतकर्यांनी या पथकाला घेराव घातला. शेतीबाबतच्या व्यथा मांडल्या. दरवर्षी साधारणत: एकरी पाच ते सहा क्विंटल सोयाबीन होते. यावर्षी मात्र ८५ किलो तर कुठे एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन मिळाले, असे शेतकर्यांनी सांगितले. अवघ्या १५ मिनिटात पाहणी करून सदर पथक कारंजाकडे रवाना झाले. वाई आणि धोत्रा येथेही या पथकाने पाहणी केली. या पथकाकडून नंतर केंद्र सरकारकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
*शेतात गाड्यांच्या लाईटाद्वारे पथकाची पाहणी
दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक सोमवारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील इरळा येथे अंधार पडल्यानंतर दाखल झाले. आता पाहणी कशी करावी म्हणून पथकात असलेल्या गाड्यांचा ताफा एका रांगेत उभा केला व शेतात उजेड पाडून पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी चातकासारखी पथकाची वाट पाहत होते. ते जेव्हा आले तेव्हा अनेक शेतकरी ह्यआता अंधारात काय पाहताह्ण, असे बोलले. तेवढय़ातच यांनी वरीलप्रमाणे पाहणी केल्याबरोबर येथे उपस्थित तरूण शेतकर्यांनी ह्यव्हॉट अँन आयडियाह्ण म्हटल्याबरोबर एकच हशा पिकला.