जलकुंभातूनच होतोय पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:36 IST2019-04-12T16:36:05+5:302019-04-12T16:36:12+5:30
इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते.

जलकुंभातूनच होतोय पाण्याचा अपव्यय
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते.
इंझोरी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. आता या ठिकाणी म्हसणी येथील जीवन प्राधीकरणच्या योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत असून, यासाठी जामदरा घोटी येथून मोटारपंपाद्वारे जलकुंभात पाणी सोडले जात आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गावातील लोकांना मुबलक पाणी पुरवठाही होत आहे; परंतु ही योजना राबविताना पाण्याच्या बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. इंझोरी येथील जलकुंभात पाणी सोडण्यासाठी मोटारपंप सुरू केल्यानंतर ते बंद करण्याची तसदीच घेतली जात नाही. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचा अपव्यय सुरू होतो. जवळपास दोन ते तीन तास जलकुंभावरून पाण्याच्या धारा कोसळतच राहतात. यामुळे प्रत्येक वेळी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, जीवन प्राधीकरण किंवा इतर संबंधित यंत्रणेकडून याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. ग्रामपंचायतींनी या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजनांचे प्रस्तावही पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात आले आहेत, तर दुसरीकडे इंझोरी येथे अडाण प्रकल्पातील मुबलक साठ्यामुळे योग्य पाणी पुरवठा होत असतानाही प्रशासनाकडूनच त्याचा अपव्यय केला जात आहे.
इंझोरी येथील जलकुंभातून पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहितीच आपल्याला मिळाली नाही. आता याबाबत संबंधित यंत्रणेला कळवून हा प्रकार तातडीने बंद करण्याची सुचना करू.
-किसन वडाळ
ग्रामसेवक, इंझोरी