केंद्राचे पथक आज यवतमाळात
By admin | Published: June 2, 2016 12:07 AM2016-06-02T00:07:46+5:302016-06-02T00:07:46+5:30
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवार २ जून रोजी जिल्ह्यात येणार आहे.
दुष्काळी उपाययोजना : जलयुक्त शिवार योजनेची पाहणी
यवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवार २ जून रोजी जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच गावांना पथक भेट देणार असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यासोबतच जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी करणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली आहे. यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नाही. न्यायालयाने राज्य शासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. त्यानंतर शपथपत्रात उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे गावपातळीवर शेतकऱ्यात संताप दिसत आहे. आता या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक गुरुवारी यवतमाळात दाखल होत आहे. नागपूरहून सदर पथक सकाळी ९ वाजता यवतमाळात दाखल होणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पावर सुरू असलेल्या लोकसहभागाच्या कामाची पाहणी करेल. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील कीटा गावाला भेट देईल. त्यानंतर पथक अमरावती जिल्ह्यात जाणार आहे. त्यावेळी मार्गावरील चिंचबर्डी आणि लासीना गावाला भेट देण्याची शक्यता आहे. या गावातील शेतकऱ्यांशी पथकातील अधिकारी संवाद साधणार आहे. (शहर वार्ताहर)
प्रशासन सज्ज
केंद्राचे पथक जिल्ह्यात येत असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. भेटी देणाऱ्या गावाची यादी प्रशासनाने तयार केली आहे. सदर पथक शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि परिस्थिती पाहून केंद्राला काय अहवाल देतात यावर मदतीचे गणित अवलंबून आहे. मात्र या दौऱ्याबाबत प्रशासनाने गोपनीयता ठेवली होती.