शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करा
By admin | Published: May 29, 2016 02:35 AM2016-05-29T02:35:23+5:302016-05-29T02:35:23+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल,
किशोर तिवारी : उमरखेड पंचायत समितीमधील बैठकीत फौजदारी कारवाईची तंबी
उमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला.
पीक कर्ज वाटपासंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी तिवारी बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र नजरधने, तहसीलदार भगवान कांबळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बँकेने केलेल्या कर्ज वाटपाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. बँकांनी खूप कमी प्रमाणात कर्ज वाटप केल्याचे यावेळी उघड झाले. काही शेतकरी तर गेल्या अनेक दिवसांपासून पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहे. तरीही त्यांना कर्ज मिळाले नाही, अशी अनेक प्रकरणे पुढे आली. त्यामुळे किशोर तिवारी चांगलेच भडकले. त्यांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कर्ज पुरवठा करणे हे बँकेचे कर्तव्य असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे.
असे असतानाही तुम्ही कर्ज वाटप का करीत नाही, अशा शब्दात तिवारी यांनी बँक प्रतिनिधींची कानउघाडणी केली. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज पुरवठा झालाच पाहिजे, अन्यथा फौजदारी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला बँकेचे जे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित नसतील त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदार भगवान कांबळे यांंना तिवारी यांनी दिले. फौजदारी कारवाई करण्याच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र तिवारी यांचा इशारा प्रत्यक्षात उतरणार का हे १५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे.
(शहर प्रतिनिधी)