जिल्हाधिकाऱ्यांनी केली आस्थेवाईक विचारपूस
By admin | Published: November 23, 2015 02:09 AM2015-11-23T02:09:39+5:302015-11-23T02:09:39+5:30
अपंगांना कृत्रिम हात-पाय बसविण्याचे काम सुरू असतानाच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे आगमन झाले. त्यांनी अपंगांची आस्थेवाईक विचारपूस केली.
अपंगांना कृत्रिम हात-पाय बसविण्याचे काम सुरू असतानाच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे आगमन झाले. त्यांनी अपंगांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्यातच दोन हात नसलेली मोहीनी डगवार ही विद्यार्थिनी दिसताच, त्यांनी तिला जवळ बोलावून उपस्थितांना तिची स्वत: विशेष ओळख करून दिली. ही मुलगी जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असते, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीनीने कौतुक केले. दोन हात नसतानाही तिची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. आता तिला या शिबिरातून हात मिळाल्यावर तिची जिद्द दुप्पट होणार आहे. मोहीनीला कृत्रिम हात बसवून देत असताना जिल्हाधिकारी तिथे थांबले. या मेहनती विद्यार्थिनीची जडणघडण पाहताना त्यांनी इतरांनाही मोहीनीची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
अपंगांच्या मनात खूप जिद्द असते. आता आम्ही ज्या अपंगांना कृत्रिम पाय बसवून दिले, ते लगेच चालण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना ते शक्यही होते. त्यामागे त्यांची ईच्छाशक्ती असते. कृत्रिम अवयवांच्या संदर्भात यवतमाळात अजूनही म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसत नाही. अशी शिबिरे या परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. या शिबिराचे आयोजनही अत्यंत निटनेटके झाले.
- डॉ. सलील जैन, कृत्रिम अवयव विशेषज्ञ, पुणे