वणीचा शिक्षण विभाग अद्यापही अनाथच
By Admin | Published: June 2, 2016 12:14 AM2016-06-02T00:14:31+5:302016-06-02T00:14:31+5:30
राज्य शासन प्रगत महाराष्ट्राची स्वप्न बघत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.
रिक्तपदांचा आजार : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कशी? वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारीच नाही
विनोद ताजने वणी
राज्य शासन प्रगत महाराष्ट्राची स्वप्न बघत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. अभ्यासक्रमातील बदल, परीक्षा पद्धतीतील बदल, शाळांत भौतिक सुविधांची सक्ती, शिक्षकांना नको तेवढे प्रशिक्षण, याचा सपाटा सुरू आहे. मात्र आवश्यक तेवढे शिक्षक व मनुष्यबळच देण्यात कसूर होत असल्याने गुणवत्तेची एैसीतैसी होत आहे. त्यात येथील शिक्षण विभाग अनाथ झाला असून त्याला रिक्त पदांचा आजारही जडला आहे.
सर्व विद्यार्थ्यांना मोफत, सक्तीचे व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी १५ वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियान नावाची चळवळ केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आली. त्यासाठी गटसंसाधन केंद्र, समूह शाळा, केंद्र शाळांची निर्मिती करण्यात आली. पर्यवेक्षकीय यंत्रणा व प्रत्यक्ष अध्यापनात सहकार्य करणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली. मात्र विविध स्तरावरील यंत्रणेत कार्य करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आवश्यक त्या प्रमाणात कधीच देण्यात आले नाही. त्यामुळे तोकडी यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचविण्यात गुंतून गेली. प्रत्यक्ष अध्यापनाचा दर्जा वाढविण्यासाठी कोणालाही सवड मिळाली नाही. गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळाले की, नाही हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन तपासून पाहण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे कागदोपत्री वाढलेल्या गुणवत्तेनेच महाराष्ट्राची छाती फुगली. मात्र आता ती केवळ सुज होती, याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अनेक शाळांमध्ये विषयाला आवश्यक शिक्षक नाही. बहुवर्गीय पद्धती शिक्षणाच्या प्रगतीला मारक ठरत आहे.
येथील पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा गाडा केवळ ओढला जात आहे. आता बदल्यांचे वारे वाहू लागले. मात्र येथील गटशिक्षणाधिकारी हे पदच कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. केवळ प्रभारावरच डोलारा उभा आहे. राज्य शासनाच्या शिक्षण एस.व्ही.बहाळे यांची वणी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली केली. मात्र ते अद्याप येथे रूजू झाले नाही. येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या निम्म्या जागा काही वर्षांपासून रिक्त आहेत. तीन विस्तार अधिकारी कार्यरत होते. त्यातील दोघांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची येथे नियुक्तीच करण्यात आली नाही.
केंद्र प्रमुखांचे पदेही रिक्तच
येथील पंचात समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी सोयाम यांची झरी व नगराळे यांची मारेगाव पंचायत समितीत बदली करण्यात आली आहो. मात्र त्यांच्या जागी अद्याप दुसरे अधिकारी देण्यात आले नाही. त्यामुळे येथे आता केवळ मेश्राम हे एकच शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत आहे. ते संपूर्ण तालुक्याचा कारभार कसा सांभाळणार, हे कोडेच आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत १३ केंद्र आहेत. मात्र केंद्र प्रमुखांची संख्या केवळ पाचच आहे. आता दोन केंद्र प्रमुख देण्यात आल्याचे कळते. तरीही प्रत्येक केंद्र प्रमुखाला दोन केंद्रांचा कारभार सांभाळावा लागणार असल्याने त्यांचा वेळ माहिती गोळा करणे व पोहोचविणे यातच जाणार आहे. अध्यापन प्रक्रियेकडे लक्ष द्यायला त्यांना सवडही मिळणार नाही. मग गुणवत्ता वाढणार कशी व प्रगत महाराष्ट्र होणार कसा, हा प्रश्न अनुत्तरीय आहे. राज्य शासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे.