सर्वच पक्षांचा उडाला गोंधळ

By admin | Published: February 2, 2017 12:17 AM2017-02-02T00:17:27+5:302017-02-02T00:17:27+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला.

The fierce clash of all the parties | सर्वच पक्षांचा उडाला गोंधळ

सर्वच पक्षांचा उडाला गोंधळ

Next

ऐनवेळी उमेदवार बदलविले : पुसदमध्ये भलत्यालाच एबी फॉर्म
यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला. पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलवून ऐनवेळी काही पक्षांनी भलत्यालाच एबी फॉर्म दिल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. शेवटपर्यंत कोणत्याच पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. तथापि काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने काही इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी काही गट व गणांचे उमेदवारही निश्चित झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीतून सर्वच पक्षांच्या यादीत अचानक बदल सुरू झाले. काही ठिकाणी आधीचे उमेदवार बदलवून नवीन इच्छुकांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सर्वच पक्षांच्या याद्या रात्रीतून बदलल्या.
बुधवारी सकाळपासून बदलाचे वारे वाहू लागल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नेमकी उमेदवारी कुणाला मिळाली, हे बराच वेळ कार्यकर्त्यांना कळलेच नाही. विशेषत: पुसद तालुक्यातील उमेदवारीवरून काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेत प्रचंड गोंधळ सुरू होता. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पक्षांचे उमेदवार बदलविण्यात आले. त्यामुळे सर्वच गोंधळात पडले होते. एकदाची यादी अंतिम झाल्यानंतर संभ्रमाची स्थिती नष्ट झाली. तोपर्यंत सर्वच पक्षांत गोंधळ सुरू होता.
पुसदच्या याद्या रखडल्या
काँग्रेस, शिवसेना व भाजपाची पुसद तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शेवटपर्यंत रखडून होती. या तीनही पक्षांनी यादीत अनेकदा बदल केले. एकदा टाकलेले नाव खोडून पुन्हा तेथे नवीन नाव लिहिले गेले. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे दुपारी ३ वाजतापर्यंत या पक्षांच्या याद्या सतत बदलत राहिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
ऐनवेळी छावणी बदलली
काँग्रेसच्या काही तालुक्यातील इच्छुकांना ऐनवेळी भाजपाने उमेदवारी बहाल केली. काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवार बदलले. शिवसेनेही तगडे उमेदवार देण्यासाठी काही तालुक्यात शेवटपर्यंत फेरबदल केले. राष्ट्रवादीची सर्व मदार पुसदवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यातील उमेदवार निश्चित केल्यानंतरच इतर तीनही पक्षांनी उमेदवारांची निश्चिती केली. परिणामी पुसद विभागात शेवटपर्यंत गोंधळाची स्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

जि.प.चे ५३९ तर पं.स.चे ९३३ उमेदवार
जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी एकूण ५३९ तर १६ पंचायत समित्यांसाठी एकूण ९३३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. नामांकनाच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली होती. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केल्याने प्रशासकीय यंत्रणाही भांबावून गेली होती. एकाचवेळी गर्दी झाल्याने तहसीलमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती होती. उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याने तहसील कार्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. गोधणी, पांढरकवडा, बसस्थानक चौक, आदी मार्गावर वाहनांची लांब रांग लागली होती. कार्यकर्ते गटागटाने आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ गर्दी करीत होते.

 

Web Title: The fierce clash of all the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.