पन्नाशी पार शेतमजुरांनी दिली तीन तासांची परीक्षा, साक्षरतेचे मिळणार प्रमाणपत्र

By अविनाश साबापुरे | Published: March 17, 2024 07:28 PM2024-03-17T19:28:34+5:302024-03-17T19:28:48+5:30

प्रौढ निरक्षरांसह शिक्षकांच्याही चेहऱ्यावर उमटली समाधानाची लकेर

Fifty passed farm laborers took a three-hour exam, they will get a certificate of literacy | पन्नाशी पार शेतमजुरांनी दिली तीन तासांची परीक्षा, साक्षरतेचे मिळणार प्रमाणपत्र

पन्नाशी पार शेतमजुरांनी दिली तीन तासांची परीक्षा, साक्षरतेचे मिळणार प्रमाणपत्र

यवतमाळ: अर्धे वय उलटून गेले... शेतमजुरी करता-करता पाटीपुस्तकाशी नातेच तुटले... पण एवढे दिवस अज्ञानाचा अंध:कार सोसल्यानंतरही मनात शिकण्याची उर्मी कायमच होती... नेमकी हीच उर्मी घेऊन रविवारी हजारो बाया-बापड्यांनी शाळेत हजेरी लावली अन् तीन तास एकाच जागी स्थिर बसून परीक्षा दिली. पन्नाशी पार पोहोचलेल्या प्रौढ असाक्षरांनी परीक्षेतून आनंद मिळविल्याचे पाहून रविवारी शिक्षकांच्याही चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली.

नव भारत साक्षरता अभियाना अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारने योजना शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत केव्हाही या अन् परीक्षा द्या, अशी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक खेड्यातले नोंदणीकृत निरक्षर सकाळीच वावरात गेले. दुपारी जेवण आटोपून परीक्षेला आले. परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक व अन्य शिक्षक मात्र सकाळी ९ वाजतापासूनच शाळेत त्यांची वाट पाहात होते. दुपारी परीक्षार्थी आल्यावर पेपर सुरू झाला अन् शिक्षकही चकीत झाले. कारण ज्यांना आपण अडाणी समजतो, ते प्रौढ परीक्षार्थी अगदी मन लावून, मग्न होऊन तीन तास प्रश्नपत्रिका सोडविताना दिसून आले. आता या परीक्षेत एकंदर १५० पैकी ५१ म्हणजेच किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या निरक्षर प्रौढांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन वाजता आले तीन जण!
यवतमाळ जिल्ह्यातील ताडसावळी येथील जिल्हा परिषद शाळेतून तीन प्रौढ निरक्षरांची नोंद झाली होती. ५७ वर्षांचे कर्णू श्यामराव कुडमते, ५२ वर्षांच्या सीताबाई कर्णू कुडमते आणि ४७ वर्षांच्या सुरेखा दत्ता मोगरे अशी या परीक्षार्थ्यांची नावे आहेत. त्यांची परीक्षा घेण्यासाठी ताडसावळी केंद्रावर चार शिक्षक सकाळपासूनच परीक्षा साहित्य घेऊन, बाकावर आसन क्रमांक टाकून सज्ज होते. परंतु, तीनही परीक्षार्थी आपली दैनंदिन कामे आटोपून दुपारी दोन वाजता शाळेत आले.

कारागृहातही परीक्षेची सोय... घरातूनही पेपर ! 
ज्या जिल्ह्यात कारागृहातील प्रौढ व्यक्तीची उल्लास ॲपवर नोंदणी झालेली आहे, त्याच्यासाठी कारागृह प्रमुखामार्फत माहिती घेऊन कारागृहातच परीक्षा केंद्र देण्याची सूचना योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी केली होती. तर शरीरिकदृष्ट्या अक्षम, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी त्याच्या घरी किंवा दवाखान्यातच पेपर सोडविण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आली होती. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात अशी नोंदणी नसल्याचे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Fifty passed farm laborers took a three-hour exam, they will get a certificate of literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.