ढाणकीत लोकसहभागातून खोदले चार तलाव
By admin | Published: June 1, 2016 12:17 AM2016-06-01T00:17:40+5:302016-06-01T00:17:40+5:30
सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे.
तीव्र पाणीटंचाई : नागरिकांनी दिला एकजुटीचा संदेश
ढाणकी : सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे. त्यांना सर्व गावाचीच साथ मिळाल्याने २० दिवसात जादूची कांडी फिरावी असे काम झाले. लोकसहभागातून तब्बल चार तलाव खोदण्यात आले. त्यामुळे आता यापुढे गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
३० ते ३५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या ढाणकीमध्ये बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. पाण्याची मात्र सातत्याने दरवर्षी उन्हाळ््यात टंचाई असते. यावर्षी तर पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पाण्यासाठी महिला व मुलांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्यात आल्या. परंतु काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे गावातीलच काही सक्रिय कार्यकर्ते पुढे सरसावले आणि ढाणकीचे पाणीस्रोत बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला. पाहतापाहता त्यांना गावातील इतर नागरिकांचीही साथ मिळाली. श्रमदानातून कामाला सुरूवात झाली. आणि एक दोन नव्हे तर चार तलाव खोदण्याचे काम हाती घेण्यात आले.
डॉ. लक्ष्मीकांत रावते, राजेश पुरीे, बाळू पाटील चंद्रे, शिवाजी फाळके, नितीन येरावार, गजानन गंजेवाड, दत्तात्रेय सुरोशे, अमोल तुपेकर, जहीर भाई, किशोर भंडारी, प्रफुल्ल कोठारी, मुंकुंद येल्हेकार, गजानन रावते, रमन रावते, प्रदीप मिटकरे, बाबूराव नरवाडे आदींसह असंख्य नागरिक कामाला लागले. निधी गोळा केला. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यक्तिगत पैसाही दिला आणि पाच लाख रुपये जमा झाले. यातून आता गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी सुटणार अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)