खात्री करूनच काम द्या; आता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया झाली ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:29 IST2025-01-22T17:28:28+5:302025-01-22T17:29:56+5:30
Yavatmal : नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ

Give work only after making sure; Now the character verification certificate process is online
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोठ्या शहरातील सराईत गुन्हेगार गंभीर गुन्हे करून लहान शहरात मिळेल ते काम घेत ओळख लपवून राहतात. संधी मिळाल्यानंतर तेथे मोठा गुन्हा करून पलायन करतात. अनेक प्रकरणात आस्थापनेलाच मोठे नुकसान सोसावे लागते. आता तर शैक्षणिक क्षेत्रातही पुरुष शिक्षकांबाबत चारित्र्य पडताळणी सक्तीची केली आहे. यामुळे प्रत्येकाने नंतर पश्चाताप करण्याऐवजी आपल्याकडे असणाऱ्या कामगाराच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची खात्री करून घ्यावी.
चारित्र्य पडताळणी करताना संबंधित व्यक्तीबाबतची माहिती पोलिस ठाणे स्तरावरून मागविली जाते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या व्यक्तीचे वास्तव्य राहिले आहे, त्यांच्याकडून वर्तणुकीबाबतचा अहवाल घेण्यात येतो. त्यानंतरच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे ओळख लपवून गुन्हे करणाऱ्यांवर जरब निर्माण झाली आहे. शिवाय आस्थापनांनाही चारित्र्यवान कामगार निवडण्याची संधी यातून मिळत आहे.
चारित्र्य पडताळणी कोणासाठी आवश्यक?
शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था, रुग्णालय येथे काम करणाऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र मागितले जाते.
परप्रांतातील गुन्हेगार येऊ शकतात कामावर
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे त्या व्यक्तीचा पूर्वेतिहास उलगडणारा अधिकृत दस्तऐवज असतो. बऱ्याचदा इतर राज्यात, जिल्ह्यात गंभीर गुन्हा करून ओळख लपवत नव्या ठिकाणी कामावर रूजू होण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न असतो. या पडताळणीतून त्यांना असे करता येत नाही. त्यामुळे पुढचा धोकाही टळतो.
सीसीटीएनएस प्रणाली
या प्रणालीमुळे देशभरातील गुन्हेगारांची नोंद एकत्र होत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावे कोणते गुन्हे कुठे दाखल आहेत, हे सहज शोधता येते. ओळख लपवून गुन्हेगार राहू शकत नाही.
वर्षभरातील चारित्र्य पडताळणी अर्ज
एकूण अर्ज - २०६४४
मंजूर अर्ज - २०१३२
नामंजूर - ७८
प्रलंबित - २५८
सेंट टू सिटीझन - १७२