भूजल पातळी घसरली
By admin | Published: May 30, 2016 12:05 AM2016-05-30T00:05:33+5:302016-05-30T00:05:33+5:30
अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे.
भूजल सर्वेक्षण : जिल्ह्यात सर्वाधिक घट कळंब तालुक्यामध्ये
यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे. कळंब तालुक्याच्या भूजल स्रोतात सर्वाधिक घट झाली आहे. मान्सून लांबल्यास स्थिती बिकट होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्याचा भूभाग हा ब्लॅक बेसॉल्टपासून तयार झाला आहे. या दगडाचा गुणधर्म अधिक काळ पाणी साठवून ठेवणे हा मुळातच नाही. यामुळे पावसाळयात थोडा पाऊस आला तरी विहिरी ओढे दुथडी भरून वाहतात. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी घसरते. यामुळे मुबलक पाऊस कोसळला तरी उन्हाळयात पाणीटंचाई निर्माण होते.
गतवर्षी अपुरा पाऊस पडल्याने पाण्याचे स्रोत वेळेपूर्वीच कोरडे पडण्याच्या प्रक्रि येला सुरूवात झाली. यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. १६ तालुक्यांतील ६४ वॉटरशेडमध्ये येणाऱ्या १७९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.४५ मीटरने घसरली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार कळंब तालुक्यात सर्वाधिक ०.५८ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक भीषण स्थिती आहे. सर्वात कमी घट घाटंजी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी ०.३२ मीटरने घसरण झाली आहे. (शहर वार्ताहर)
भूजल पातळी घसरणे ही बाब चिंताजनक आहे. मात्र भविष्यात या स्थितीवर मात करण्यासाठी रिचार्ज शाप खोदले जात आहे. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
- राजेश सावळे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक