इनामी काट्या कुस्त्यांच्या दंगलीचे थाटात उद्घाटन
By admin | Published: November 26, 2015 02:51 AM2015-11-26T02:51:01+5:302015-11-26T02:51:01+5:30
येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात आयोजित काटा कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन बुधवारी माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते...
५०० मल्ल : अकोल्याच्या पहेलवानाने जिंकली उद्घाटनीय कुस्ती
यवतमाळ : येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात आयोजित काटा कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन बुधवारी माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते हौदाचे पूजन व कुस्तीची जोड लावून करण्यात आले. जिल्हा कुस्तीगीर संघटनेने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत देशभरातील पाचशेहून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे.
लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा आणि वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी या स्पर्धेला हजेरी लावली. खासदार विजय दर्डा यांचा यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्कार केला. विविध ठिकाणाहून आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा आनंद त्यांनी लुटला. खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते कुस्तीचा जोडही यावेळी लावण्यात आला.
उद्घाटनीय कुस्ती सिद्धोधन गाडेकर (बाळापूर) आणि तेजस पहेल मोगरे यवतमाळ या मल्लांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, प्रताप पारसकर, दीपक ठाकूर, कुलभूषण तिवारी, सुरेश जयसिंगपुरे, उद्धव बाकडे आदी उपस्थित होते. उद्घाटनीय कुस्ती सिद्धोधन पहेलवानाने मोगरे पहेलवानाला चीत करून जिंकली.
उद्घाटनानंतर १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपयांच्या कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. या कुस्तीत दहा वर्षाच्या मल्लांपासून साठ
वर्षाच्या मल्लांनी सहभाग नोंदविला. संध्याकाळी १२ ते १ क्रमांकाच्या इनामी कुस्त्यांना सुरूवात झाली होती.
जिल्हा कुस्ती संघटनेतर्फे सलग १२ व्या वर्षी आयोजित कुस्त्यांच्या या दंगलीत यावर्षी सात लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. या स्पर्धेत दिल्लीचा कुलदीप पहेलवान, भिलाईचा अवधेश पहेलवान, हरियाणा, भिलवाडा (राजस्थान) च्या पहेलवानांसोबतच पुण्यातील महादेव सरगर, गणेश जगताप, संग्राम पाटील, शिवराज राक्षे, बाला जरे, आबा अटकळे, देवानंद पवार, शरद पवार आदी नामांकित मल्ल सहभागी झाले आहे. तसेच हिंगोली, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, पुसद, नांदेड येथील मल्लही सहभागी झाले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)