अभ्यागतांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद सीईओंकडे दोनच दिवस
By admin | Published: June 3, 2016 02:39 AM2016-06-03T02:39:23+5:302016-06-03T02:39:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने एका तरुणाने विष प्राशनाचा प्रकार जिल्ह्यात ताजा असताना आता यवतमाळ
कक्षाबाहेर फलक : राणीअमरावतीच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने एका तरुणाने विष प्राशनाचा प्रकार जिल्ह्यात ताजा असताना आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अभ्यागतांना भेटण्यासाठी आठवड्याचे दोनच दिवस राखीव ठेवले आहे. यासाठी त्यांनी आपल्या कक्षाबाहेर तसा फलकही लावला आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेत आलेल्या राणीअमरावतीच्या शिष्टमंडळाला यामुळे परत जावे लागले.
जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांचे जिल्हा परिषदेशी थेट संपर्क असतो. अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्यास अनेक जण थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून आपल्या अन्यायावरील दाद मागतात. परंतु आता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंघला यांनी अभ्यागतांना भेटण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस राखीव ठेवले असून येणाऱ्या अभ्यागतांना ते दुपारी ३ ते ६ याच वेळेत भेट देणार आहे. यामुळे ऐनवेळी शिष्टमंडळ अथवा कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्यांना मात्र सीईओंची भेट होणार नाही. अभ्यागतांना सोमवार किंवा शुक्रवारचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)