ड्रमभर पाण्यासाठी खाकी वर्दीही रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:20 PM2018-04-03T22:20:43+5:302018-04-03T22:20:43+5:30

शहरातील विघातक घटनांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. त्यात आता पाण्यासाठी भांडणतंटे होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. पण खुद्द पोलीसांच्या घरीच पाण्याचा थेंब नाही.

Khaki uniforms queue for drum water | ड्रमभर पाण्यासाठी खाकी वर्दीही रांगेत

ड्रमभर पाण्यासाठी खाकी वर्दीही रांगेत

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस वसाहतीत टंचाई : नगरपरिषद, पोलीस विभागाचाही टँकर फिरकेना

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील विघातक घटनांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. त्यात आता पाण्यासाठी भांडणतंटे होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. पण खुद्द पोलीसांच्या घरीच पाण्याचा थेंब नाही. स्वत:च्या घरात पाणी आणणे आणि ते कुलूप लावून जपणे, ही विदारक स्थिती चक्क पोलीस वसाहतींमध्ये आहे. पोलीस वसाहतींमध्ये मुबलक पाणी असले तरी नियोजनाची टंचाई असल्याने पोलीस कुटुंबीयांची तहानेने वाताहत होत आहे.
ड्रमभर पाण्यासाठी पोलीसांच्या आप्तांना रात्रभर जागावे लागत आहे. दिवसभर रस्त्यावर ड्रम ठेवून टँकरची वाट पाहिली जाते, पण टँकरच येत नाही अन् रिकामा ड्रम घेऊन पोलिसांना इतर वसाहतींमध्ये चकरा माराव्या लागत आहे. गेल्या २० दिवसांपासून या भागात नळ नाही. खाकी वर्दी पाण्यासाठी अक्षरश: रांगेत उभी असल्याचे चित्र आहे. पळसवाडी कॅम्प, कवेलू वसाहत आणि पोलीस वसाहतीच्या १३ इमारतींमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागात मुबलक पाण्याचे स्त्रोत आहे. मात्र नियोजनच नाही. यामुळे पाण्याठी रात्र जागून लगतच्या भागातून पाणी आणावे लागते. हापशी आणि बोअरचा आधार घ्यावा लागतो. पोलिसांच्या अर्धांगिणी अक्षरश: वैतागल्या आहेत.
नगरसेवकाचे उद्धट उत्तर
कवेलू वसाहतीमध्ये २० दिवसांपासून नळ नाही. महिलांनी पाण्यासाठी नगरसेवकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यांना तितक्याच उद्धटपणाने अरेरावीचे उत्तर ऐकायला मिळाले. आपल्या भागात दररोज टँकर येतो, असे म्हणून नगरपरिषदेचा एकही टँकर या भागाकडे फिरकला नाही. गत चार दिवसांपासून या भागातील महिला पाण्याच्या टाक्या रस्त्यावर आणून ठेवतात आणि दिवसभर प्रतीक्षा करतात. पुन्हा टाक्या नेऊन ठेवतात. मात्र कोणीही त्यांची दखल घेत नाही, अशी खंत सुवर्णा गायकवाड यांनी व्यक्त केली.
वर्दी धुवायची कशी?
पोलीस वर्दीला स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो. आता पुढील काळात वर्दी धुण्यासाठी पाणी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. सध्या आठ दिवसानंतरच आम्ही कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो. या पाण्याचा इतर कामासाठी वापर करीत आहे. पाण्याच्या काटकसरीनंतरही आम्हाला पाणी मिळत नाही, अशी खंत कविता आमनेरकर यांनी व्यक्त केली.
पाण्यासाठी घरातच कैद
उन्हाळयाच्या सुटीत पाहुण्यांना येण्यासाठी निमंत्रणही देऊ शकत नाही. पाण्याची स्थिती पाहून बाहेरगावची मंडळी येण्याचे टाळत आहे. पाण्यामुळे कुठे जाताही येत नाही. पोलिसांचे कुटुंबीय घरातच कैद झाले. पोलीस वसाहतीचे हे चित्र अतिशय चिंताजनक आहे. पाण्यासाठी हापशीवर महिलांना जावे लागते. मात्र याला आमचा नाईलाज आहे, असे अश्विनी भुजाडे म्हणाल्या. पाण्यासाठी नगरसेवकाला सांगून कंटाळलो, असे पुष्पा गायकवाड म्हणाल्या. कवेलू क्वॉर्टरला विहीर आहे. मात्र त्यात कचरा आहे. ही विहीर साफ करून उपसा केला तर मुबलक पाणी लागेल. याबाबत आम्ही वारंवार सांगितले. परंतु अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. एखादी हापशी तरी गरजेची आहे, असे त्या म्हणाल्या.
नियोजनचा अभाव
या भागात प्रत्येक बिल्डिंगपर्यंत अंडरग्राउंड पद्धतीने पाईप बसवून पाण्याचे पॉर्इंट दिले तर पाण्याचा अर्धा प्रश्न सुटतो. पळसवाडी मैदानातील बोअरवेलला मुबलक पाणी आहे. त्याचा वापरच होत नाही. या पाण्याचा वापर झाला तर पोलीस वसाहतीमधील पाणीप्रश्नच सुटतो. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत अरविंद जाधव यांनी व्यक्त केले.
गोदाम फैल, शास्त्रीनगरात सीओंना घेराव
दरम्यान, मंगळवारी गुरूदेव युवा संघाच्या नेतृत्वात गोदाम फैल आणि शास्त्रीनगरातील महिलांनी पालिकेवर धडक दिली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांनी दररोज पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याची विनंती केली. यावेळी गुरूदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, शंकर जतकर, रूपेश शस्त्रकार, राहुल मसराम, अनिल शेंडे, चेतन कटले, कैलास मडावी, गोपाल राऊत, नरेश मेश्राम, सरीता रिनाईत, पूजा रिणाईत, सुशिला राय, सुशिला मलकापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पोलिसांच्या घरात पाण्याला कुलूप
१३ बिल्डींगमधील पाण्याची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. या ठिकाणी पाणी वितरणासाठी दक्षताजवळील बोअरवेलवरून पाच पॉर्इंट देण्यात आले. या पॉर्इंटवरून पाणी इमारतीपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र कोणीच घेतली नाही. या भागातील कुटुंबीयांनी लोकवर्गणीतून पाईप घेतला. हा रबरी पाईप मोजक्याच इमारतीपर्यंत पोहचतो. त्यातही प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचत नाही. बिल्डिंगपासून पाण्याच्या पॉर्इंटपर्यंत बरेच अंतर आहे. या काळात ज्या गृहिणीने पाणी घरापर्यंत नेले, तर थोड्याच वेळात दुसरा कोणीतरी पॉर्इंटचा पाईप काढतो. स्वत:चा पाईप लावतो. यामुळे एका घरातले पाणी भरण्यासाठी तीन ते चार तास लागतात. यामुळे बोअरला पाणी असले तरी एकाच बिल्डिंगमध्ये दुसºया घराला पाणी मिळण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. ज्या दिवशी नळाचे पाणी येणार त्या दिवशी टाक्या भाड्याने आणून पाणी भरले जाते. इतकेच नव्हेतर पोलीस वसाहतीमध्ये पाणी कुलूपात ठेवावे लागते.

Web Title: Khaki uniforms queue for drum water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी