लॉकडाऊनला त्रासून मागितले इच्छामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:24+5:30

कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे.

Lockdown | लॉकडाऊनला त्रासून मागितले इच्छामरण

लॉकडाऊनला त्रासून मागितले इच्छामरण

Next
ठळक मुद्देउपासमार असह्य, तारपुरातील बेरोजगार युवकाचे थेट पंतप्रधानांकडे आर्जव

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसर्गापेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. यवतमाळातील तारपुरा परिसरातील युवकाने लॉकडाऊनच्या परिणामाची दाहकताच या अर्जातून मांडली आहे.
कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे. अशा योजनांचा लाभार्थी नसलेल्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. माझ्या सारख्या अनेकांपुढे आता जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. माझा ऑनलाईन कामाचा व्यवसाय आहे. २० मार्चपासून हे काम पूर्णत: बंद आहे. सहा सदस्य असलेल्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. जवळ असलेला पैसा संपला असून आता त्यांचे पालन पोषण कसे करायचे ही समस्या आहे. अशी व्यथा मांडताना लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या काळ्याबाजाराकडेही त्याने लक्ष वेधले आहे.
देशापुढील सीएए, एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटला, डबघाईस आलेल्या देशातील अर्थव्यवस्थेची समस्या संपली, पोलीस विभाग लॉकडाऊनच्या काळात, अवैध दारू, गुटखा, तंबाखू या माफियांना संरक्षण देत आहे. अवैध दारू विक्री, पानठेले जोरात सुरू असून जीवनावश्यक वस्तूही दामदुप्पट भावात विकल्या जात आहे. लॉकडाऊनचा हा परिणाम असल्याचे कुणाल चांदूरकर याने आपल्या निवेदनातून मांडले आहे. या परिस्थितीमुळे व्यथित होऊनच त्याने इच्छामरणासारखा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे आदेश
कुणालाच्या इच्छामरणाच्या परवानगी अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी व यवतमाळ तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्याच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिले आहे. आता कुणालने निवेदनात मांडलेली काळ्याबाजाराची परिस्थिती बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने विकल्या जात असल्याची व्यथा कुणालने मांडली आहे.

लॉकडाऊन जरुरी, पण साईड इफेक्टही अनेक
विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असले तरी त्याचे जनजीवनावर साईड इफेक्ट होत आहे. त्याची दाहकता कुणालच्या अर्जातून पुढे आली. असे अनेक तरुण अस्वस्थ आहे. त्यांची मागणी निवेदनाच्या रुपात पुढे आली नसली तरी प्रशासनाने स्वत:हून उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.