फटाकेविरहित दिवाळी करा
By admin | Published: November 11, 2015 01:55 AM2015-11-11T01:55:21+5:302015-11-11T01:55:21+5:30
फटाक्याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षित करावे, ...
शिक्षण विभाग : अनेक शाळा-महाविद्यालयात दिली विद्यार्थ्यांना शपथ
यवतमाळ : फटाक्याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षित करावे, अशा प्रकारचे आदेश शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत.
याबाबत शासनाने सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या आदेशाचाही संदर्भ जोडला आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने प्रसारमाध्यमांद्वारा याबाबत जनजागृती करावी. तसेच शिक्षक व प्राध्यापकांनी याबाबत विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत प्रशिक्षित करावे, असे न्यायालयाचे निर्देश आहेत.
सण, उत्सवप्रसंगी मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदूषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने १६ आॅक्टोबर २००१ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना ध्वनी व हवा प्रदूषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याबाबत निर्देश देण्याचे सूचित करण्यात आले आहे. फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषण व ध्वनीप्रदूषण होऊन पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याने शक्यतो फटाक्यांचा वापर करू नये व फटाक्यांचा वापर करावयाचाच झाल्यास कमी शक्तीच्या फटाक्यांचा वापर करण्याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांचे मत परिवर्तन करण्याचे काम शिक्षकांनी करावे, त्यासाठी संबंधित शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी करावयाचे आहे. फटाक्याच्या आवाजामुळे व त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर होणारे एकूण दुष्परिणात विद्यार्थ्यांना सविस्तरपणे पटवून देऊन फटाक्यांबाबत वाटणारे आकर्षण कमी करण्याचे प्रयत्न करण्यात यावे आणि फटाक्यांचा वापर केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी तसेच फटाक्यांचा वापर करताना तो काळजीपूर्वक व जबाबदारीने कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना नियमातील तरतुदींची माहिती देण्यात यावी, असेही निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्येही फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये आम्ही फटाके वाजविणार नाही, अशा प्रकारची शपथसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आपण फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले. यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबविला आहे. याचे चांगले परिणामसुद्धा दिसून आले.
- सुचिता पाटेकर,
शिक्षणाधिकारी, यवतमाळ.