विनंती बदल्यांसाठी पोलिसांवर दबाव
By admin | Published: May 30, 2016 12:03 AM2016-05-30T00:03:57+5:302016-05-30T00:03:57+5:30
जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. विनंती बदलीसाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नियमाला बगल : शेवटच्या क्षणी मागितले अर्ज
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. विनंती बदलीसाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बदलीच्या ठिकाणाचे तीन पर्याय निवडावे अशी सूचना आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विनंती अर्ज करण्याची सूचना मिळाली. त्यामुळे शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांनी इच्छा नसताना बदलीसाठी विनंती अर्ज करण्यास भाग पाडण्यात आले.
शिस्तीचे खाते म्हणून लौकिक असलेल्या पोलीस दलात वरिष्ठांच्या निर्णयाविरोधात जाण्याची कोणीच हिम्मत करत नाही. मात्र काही कारण नसताना अचानक विनंती बदलीसाठी अर्ज करा, असा मॅसेज शोधपथकातील काही कर्मचाऱ्यांना देण्यात आला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना विनंती बदलीसाठी पाचारण करण्यात आले. उलट पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांना मात्र सूट देण्यात आली. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, असा संशय पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे.
बदलीसाठी सुमार कामगिरी हा निकष ठेवला असले तर, अनेक निष्क्रिय कर्मचाऱ्यांना विनंती बदलीसाठी बोलाविण्यात आले नाही. यावरून केवळ काही कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केले जात आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दबावात घेतलेल्या विनंती अर्जावरून जर बदली झाली तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला. काही कर्मचारी मॅटमध्ये जाण्यासाठी बदली आदेशाची वाट पाहत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
पोलीस दलातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून मुख्यालयातच कार्यरत असल्याची निनावी तक्रार सहा महिन्यांपूर्वी मिळाली होती. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. कुणावरही बदलीसाठी दबाव टाकण्यात आलेला नाही. असा प्रकार झाला असल्यास कर्मचाऱ्यांनी थेट संपर्क करावा.
- अखिलेशकुमार सिंह
जिल्हा पोलीस अधीक्षक