शेतकऱ्यांसाठी निवृत्त प्राचार्यांची धडपड
By admin | Published: June 4, 2016 02:15 AM2016-06-04T02:15:39+5:302016-06-04T02:15:39+5:30
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. येथील सेवानिवृत्त प्राचार्य ..
ना. म. जवळकर : पेन्शनच्या पैशातून प्रबोधनाचे कार्य
दारव्हा : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. येथील सेवानिवृत्त प्राचार्य ना. म. जवळकर यांनीसुद्धा स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन सुरू केले आहे.
त्यांनी आपल्या पेन्शनच्या पैशातून ‘शेतकरी मित्रा तू असा मरू नकोस’ अशा आशयाची दोन लाख पत्रके छापून संपूर्ण जिल्ह्यात वितरित केली. त्यांचे हे कार्य अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे येथील सेवानिवृत्त प्राचार्य नारायण महादेवराव जवळकर यांचे मन सुन्न झाले. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरूच आहे. परंतु जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत असल्याने जवळकर यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. या समाजाचा घटक म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा, अशी गाठ त्यांनी मनाशी बांधली.
त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता आत्महत्या हा पर्याय नाही. संकटातून मार्ग निघतोच. आत्महत्येनंतर कुटुंबाचे काय हाल होतात, अशा प्रकारचे भावनिक आवाहन करणारे पत्रक तयार केले आणि वितरणाला सुरुवात केली. जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पत्रके पोहोचती केली. आपल्या एसटी बसमधील प्रवासात ते प्रवाशांना स्वत: पत्रके वाटतात.
त्यांचे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू असून आतापर्यंत तब्बल दोन लाख पत्रके वाटली आहे. त्यांना अनेकांनी फोन करून या कार्याचा गौरव केला आहे. प्रशासनानेसुद्धा ना.म. जवळकर यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेवून त्यांना बळीराजा चेतना अभियानांतर्गत पुरस्कार देवून गौरव केला आहे. पेन्शनच्या पैशातून शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या विषयासाठी त्यांची ही धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.
(तालुका प्रतिनिधी)