बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:04 IST2024-08-14T18:03:55+5:302024-08-14T18:04:53+5:30
Yavatmal : २१२ कर्मचाऱ्यांच्या बँकेतील ठेवी पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली

Schools, credit institutions, temples and trusts are also in trouble because of the bank; As many as 47 crore deposits were stuck
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिला बँकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांनीच नव्हे तर मंदिर ट्रस्ट, शाळा, संस्था आणि पतसंस्थांनी पैसे गुंतविले होते. बँक अवसायनात निघाल्याने पतसंस्था आणि ट्रस्टच्या ४७ कोटींच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. या पतसंस्थांमधील ठेवीदारही यातून अडचणीत आले आहेत.
जिल्ह्यातील १२ पतसंस्थांचे ४२ कोटी रुपये महिला बँकेत अडकले आहेत. महिला बँकेने पाच वर्षांत दामदुप्पट योजना आणली होती. त्यावेळी ही महिला बँक अ वर्ग श्रेणीत होती. याशिवाय यापूर्वी पतसंस्थांनी १० ते १५ वर्षांपासून या ठिकाणी व्यवहार केला होता. यामुळे पतसंस्थांनी बिनधास्तपणे या ठिकाणी गुंतवणूक केली. अल्पावधीत पैसे दुप्पट होणार असल्याने सर्वांना ते सुरक्षित वाटले होते. यातूनच मोठ्या प्रमाणात पतसंस्थांच्या ठेवी बँकेत गेल्या. मात्र, बँक अवसायनात निघाल्यानंतर पतसंस्थांची कोंडी झाली. ठेवीदारांची संख्या मोठी असल्याने काही पतसंस्थांना फारशी झळ पोहोचली नाही. मात्र, बहुतांश पतसंस्थांचे व्यवहार प्रभावित झाले. पतसंस्थेला सावरण्यासह नफ्यावर त्याचा परिणाम झाला. पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश मिळाला नाही. या प्रकरणानंतर अस्थितरतेचे वातावरण तयार झाले. यामुळे अनेक ठिकाणच्या ठेवीदेखील गेल्या. स्वयंमसेवी ट्रस्ट आणि शाळा महाविद्यालयाच्या ठेवींवरही त्याचा परिणाम झाला.
'अ' दर्जामुळे झाली गफलत
बाबाजी दाते महिला बँक प्रकरणात पतसंस्थांनी पैसे अडकल्याचा विषय बाहेर आणला नाही. कारण यामुळे पतसंस्थांमधील ठेवी जाण्याचा धोका होता. 'अ' वर्ग दर्जा बँकेला मिळाल्याने अनेक पतसंस्थांनी कुठल्याही कायदेशीर बाबीचा विचार केला नाही. याच ठिकाणी पतसंस्थांची गफलत झाली. ती गफलतच सर्व पतसंस्थांच्या अंगलट आली.
कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा?
महिला बँकेच्या २० शाखा असून यातील १९ शाखा गैरकारभारामुळे बंद करण्यात आल्याने या बँकेमध्ये काम करणारे २१२ कर्मचारी अडचणीत आले आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांनी याच बँकेत ठेवी ठेवल्या आहेत. बँक अवसायनात गेली. पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली, यामुळे जवळ जमापुंजीच उरली नाहीं. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे.