टंचाई आराखड्याची अंमलबजावणी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:38 PM2018-05-31T23:38:05+5:302018-05-31T23:38:05+5:30

घरात एक थेंब पाणी नसतानाही यवतमाळकर जनता अतिशय संयम ठेवून सहकार्य करत आहे. काही अपवाद वगळले तर रात्र जागून पाण्याची जमवाजम करण्यात सहकुटुंब व्यस्त असतात. अशा नागरिकांच्या संयमाचा अंत प्रशासकीय यंत्रणा पाहात आहे.

Slow down implementation of the scarcity plan | टंचाई आराखड्याची अंमलबजावणी संथ

टंचाई आराखड्याची अंमलबजावणी संथ

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांचा संताप : प्रशासकीय यंत्रणेवर निष्क्रियतेचा ठपका, शहरात पाण्याचे स्रोत असूनही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरात एक थेंब पाणी नसतानाही यवतमाळकर जनता अतिशय संयम ठेवून सहकार्य करत आहे. काही अपवाद वगळले तर रात्र जागून पाण्याची जमवाजम करण्यात सहकुटुंब व्यस्त असतात. अशा नागरिकांच्या संयमाचा अंत प्रशासकीय यंत्रणा पाहात आहे. यात नगरसेवक भरडला जात असून नियोजनशून्यतेनेच टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
खासगी टँकर शहरात पाण्याच्या दुप्पट ट्रीप पूर्ण करतात तर प्रशासनाने लावलेले टँकर निर्धारित फेऱ्याही पूर्ण करत नाही. यामुळे २०० लिटर पाणी २० दिवसानंतर नागरिकांना मिळत आहे. आजूबाजूचे स्त्रोत आटले असून आता मोठी अडचण आहे. अशा भीषण स्थितीत केवळ डिझल नसल्याच्या कारणाने ३५ हजार लिटर क्षमतेचे टँकर चार तास ताटकळत उभे होते. यासाठी दोषी अधिकाºयावर कुणीही जाब विचारण्यास तयार नाही. नगरसेवक प्रभागात, जनतेत उपलब्ध असल्याने त्यालाच रोष झेलावा लागत आहे. खासगी हातपंप, बोअरवेल आटल्याने पाणीसाठा असलेल्या स्त्रोतांचे अधिग्रहण करणे अपेक्षित होते. दुर्दैवाने प्रशासनाकडून त्यासाठी कुठलीच पाऊले उचलली जात नाही. अनेकजण विहिरीतून पाणी देण्यास तयार आहे. मात्र यंत्रणा नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. टंचाईच्या नावाखाली पैशाचा चुराडा होत असून पाणी मात्र मिळत नाही. हातपंपाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. १२० फुटापेक्षा अधिक पाईप टाकण्याबाबत आता कुठे शिथीलता आली आहे. आझाद मैदानाच्या नेहरू उद्यानाच्या विहिरीतील पंप १५ दिवसापासून बंद आहे. यासाठी लेखी निवेदन देवूनही अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने काम करण्यास तयार नाही. अनेकजण दिवसा झोपा काढताना दिसतात. मोठे टँकर गोकुल हेरीटेज दारव्हा रोड, वाघापूर बायपास, जांब रोड येथे उभे असते. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रशासकीय यंत्रणा सहकार्यास तयार नसल्याने शेवटी स्थानिक नागरिक व युवकांच्या मदतीने पाणीटंचाई नियोजन केले आहे. मात्र त्यानंतरही अनेक मर्यादा येतात. गोखीवरून सुयोगनगर, लोहारा, दर्डानगर टाकीतून पाणी देण्यासाठी जीवन प्राधिकरण आता कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही. लोकवर्गणी करून बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. हा आदेश अडचणीचा ठरत आहे. समाजकल्याण विभागाच्या ७२ नवीन बोअरवेलला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. उपलब्ध टँकर २४ तास चालविल्यास शहरात किमान गरजेपुरते पाणी देता येवू शकते. गोखीशिवाय शहरातील इतर पाण्याच्या स्त्रोतांचे अधिग्रहण, नवीन स्त्रोत तयार करणे यावरही लक्ष देण्याची गरज आहे. अधिकारीवर्गाला सांगूनही अडचणी सुटत नाही. त्यामुळेच काही प्रभागांमध्ये नागरिकांचा संयम सुटत आहे. गिलाणीनगरात टँकरवर दगडफेक झाली. जगत मंदिर परिसर, भोसा परिसरात पाण्यासाठी तलवारी व सशस्त्र झडप होण्याची स्थिती निर्माण झाली होती. आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यंत्रणेमुळे निर्माण होतोय, अशी चिंता चर्चासत्रातून नगरसेवकांनी व्यक्त केली.

शहरासाठी टँकर हाच एकमेव पर्याय डोळ्यासमोर ठेवून टंचाई नियोजन करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाणार याचे परिपूर्ण भान ठेवूनच शासनस्तरावरून भरीव आर्थिक तरतूद पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतली. नगरपरिषदेनेही प्रत्येक उपाययोजनेसाठी सढळ हाताने आपल्या लोकवर्गणीचा वाटा उचलला. उपाययोजना राबविणाºया प्रशासकीय यंत्रणेने मात्र या टंचाई निवारण कृती आराखड्याची प्रामाणिकपणे अजूनही अंमलबजावणीच केलेली नाही. नगरसेवकांनी प्रभागातील मुबलक पाण्याच्या स्रोतांची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली. याची दखलच घेण्यात आली नाही. केवळ टंचाईत उपाययोजना कागदावरच राहिल्याने आज यवतमाळकर जनतेचे हाल होत असल्याचे वास्तव लोकमतच्या चर्चासत्रात प्रभाग क्र.२०, २१, २२, २३, २६ मधील नगरसेवकांनी मांडले.

टंचाई उपाययोजनेबाबत नागरिकांनी द्याव्या प्रतिक्रिया
नगरसेवकांनी पाणीवितरण करताना प्रत्यक्षात राबविणारे उपक्रम व अडचणी यांचा उहापोह ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून केला. या प्रभागातील नागरिकांनीही पाण्यासंदर्भातील अडचणी, सूचना, आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरुपात लोकमत कार्यालय, गांधी चौक येथे आणून द्याव्या. जेणे करून त्या वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देता येईल, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. प्रतिक्रिया पाठविताना प्रभाग क्रमांक, नाव व मोबाईल क्रमांक आवर्जून नमूद करावा.

वॉर रूममधील कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी बंद
जिल्हाधिकाºयांनी टंचाईसाठी वॉर रूम खुली केली आहे. येथील कर्मचाºयांचे दूरध्वनी बंद असून अनेक कर्मचारी फोन आल्यानंतर चुकीचा नंबर डायल केल्याचे सांगतात, अशा तक्रारी आहे. टंचाईत पगारदार यंत्रणा प्रामाणिकपणे काम करण्यास तयार नाही. इतकेच काय जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले फोनवर चक्क खोटे बोलतात. प्रत्येकवेळा बेंबळावर असल्याचे सांगतात. एका सदस्याने बेंबळावरूनच बेलेंना फोन लावला. तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिले. बेंबळावर असल्याचे सदस्याने सांगताच बेलेंची पोलखोल झाली. जीवन प्राधिकरणची यंत्रणा या टंचाईत कुठेच काम करताना दिसत नाही. लोहाºयात आयएमए हॉलजवळ वॉल फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यापूर्वी टँकरद्वारे प्राधिकरणाच्या टाकीतील सम्पमध्ये १४ लाख लिटर पाणी टाकले. त्यातून एकदाही नळ न येता हे पाणी गायब झाले. याबाबत विचारले असता सम्पचा वॉल लीक असल्याचे सांगितले. याची माहिती असूनही टंचाईत पाणी वाया घालणाºयांवर कारवाई काय? प्रभाग क्र.२२ मध्ये नागरिकांनी दोन दिवसांपासून टँकर अडवून ठेवला आहे. यावर वॉर रूममधील अधिकारी-कर्मचारी कुणीच भूमिका घेण्यास तयार नाही. तहसीलदार एसडीओसुद्धा टंचाई नियोजनासाठी चालढकल करत असल्याचा आरोप चर्चासत्रात नगरसेवकांनी केला.

टंचाई उपाययोजनांचा खर्च ठरतोय व्यर्थ, नियोजनात चुका
टंचाई उपाययोजनांचा आराखडा आॅक्टोबर महिन्यातच तयार झाला. जीवन प्राधिकरण ही अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा आहे. यासोबत नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागाला दोन या प्रमाणे ५६ टँकरचे नियोजन केले. नंतर ६१ टँकर लावण्यात आले. टँकर लावताना जो करार कंत्राटदारासोबत झाला. त्यात काही त्रुट्या राहिल्या. प्रभागात सहा फेºयांची अट घालताना पाणी कुठून उपलब्ध होणार याचा विचारच झाला नाही. त्यावेळी नगरसेवकांनी स्थानिक भागातील सूचविलेल्या स्त्रोतांचे प्रस्तावावर प्रशासकीय यंत्रणेने विचारच केला नाही. पालिकेने जवळपास ६० विहिरींची सफाई केल्याचे सांगितले जाते. ८० ठिकाणावरून पाणी भरण्याची सोय केल्याचा दावा होता. आज प्रत्यक्षात यापैकी काहीच दिसत नाही. संपूर्ण टँकर पाण्यासाठी एमआयडीसीच्या पॉर्इंटवर केंद्रित झाले आहे. येथेच गणित बिघडले. त्यानंतर ४० लाख रुपये खर्चून गोखीचे पाणी शहरात आणण्याचा प्रयत्न फसला. शेवटी मोठ्या टँकरचा आधार घेवून पाणी वाटप सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. केवळ यवतमाळकर जनतेच्या संयमाचा अंत पाण्याचे काम सुरू आहे. भाड्याचे पंप, विहीर सफाईचा खर्च निष्फळ ठरला. निळोण्यातही फ्लोटींग पंपावर जवळपास दीड कोटी खर्च झाले. केवळ दहा दिवस पाणी दिल्यानंतर ही यंत्रणा ठप्प झाली. एसडीओंच्या अधिकारात असलेले मोठे टँकर टंचाई काळात डिझल नसल्याने उभे राहतात. यावरून प्रशासकीय यंत्रणा किती गंभीर आहे, टंचाई उपाययोजना अंमलबजावणी करणारी यंत्रणा कामाला लावणे आवश्यक आहे. त्यातूनच टंचाईची झळ सहज कमी करता येवू शकते, असा सूर चर्चेतून पुढे आला. यावेळी प्रभाग क्र.२० चे नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, प्रभाग क्र.२२ चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, दर्शना इंगोले, प्रभाग क्र.२३ चे नगरसेवक पंकज देशमुख व रिता धावतोडे यांचे यजमान गजानन धावतोडे, प्रभाग क्र.२६ च्या नीता केळापुरे यांचे यजमान भास्कर केळापुरे उपस्थित होते. चर्चेला पुष्पा ब्राह्मणकर, गिरीधर बोरकर, संगीता कासार, अनिल देशमुख उपस्थित राहू शकले नाही.

प्रस्तावित विहिरींवरून पाण्याची विक्री
अधिग्रहणासाठी प्रस्तावित विहिरींचा ताबा घेतलेला नाही. मुन्ना बजाज, समदानी, लालाणी, जीभकाटे यांच्या विहिरींना भरपूर पाणी आहे. या विहिरींवरच्या मोटरपंपांना २४ तास वीज पुरवठा राहावा यासाठी गावठाण फिडरवरून वीजजोडणी केली आहे. त्यानंतरही एसडीओ या विहिरीचा ताबा घेण्यास तयार नाही. येथून खासगी टँकरला विक्री होते. या विहिरी आदेश येवूनही अधिग्रहीत केलेल्या नाही. याशिवाय तलावफैलातील नागमंदिर, स्मशानभूमीतील विहीर, संकट मोचन तलाव, लोहारातील महादेव मंदिर तलाव परिसरात बोअरवेल खोदल्यास हमखास पाणी आहे. या प्रस्तावांकडेही जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
नियमित

Web Title: Slow down implementation of the scarcity plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.