‘मेडिकल’मधील शस्त्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:12 PM2018-04-27T22:12:47+5:302018-04-27T22:12:47+5:30

शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे.

Surgery jam in 'Medical' | ‘मेडिकल’मधील शस्त्रक्रिया ठप्प

‘मेडिकल’मधील शस्त्रक्रिया ठप्प

Next
ठळक मुद्देयवतमाळातील पाणीटंचाईचा फटका : दररोज हवे २० हजार लिटर पाणी

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या १३ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठीच पाणी राखून ठेवले आहे.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी अद्ययावत शस्त्रक्रियागृह आहे. तिथे दररोज २० हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासते. अशुद्ध पाणी शुद्ध करून शस्त्रक्रियेची उपकरणे स्वच्छ केली जातात. तसेच शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारे कापड धुण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. यासाठी चार लाख लिटर क्षमतेचा सम्प आहे. शिवाय दोन विहिरी व चार बोअरवेल्स आणि नळ योजनेच्या पाण्याची टाकी अशी व्यवस्था आहे. टंचाई निर्माण झाल्याने येथील जलस्रोत आटले आहे. परिणामी शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पाणीच उपलब्ध होत नाही. रुग्णालय प्रशासनाने पाणी मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मार्चपासून जाणवत असलेल्या टंचाईचे नियोजन करून आतापर्यंत शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. मात्र आता पाणीच नसल्याने रुग्णालय प्रशासनच हतबल झाले आहे.
शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व अस्थीव्यंगोपचार (आर्थोपेडीक) या दोन विभागातच प्रामुख्याने मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. येथे पाण्याचा भरपूर वापर होतो. पाणी नसल्याने दोनही विभागातील १३ शस्त्रक्रिया शुक्रवारी सकाळी ऐनवेळेवर थांबवाव्या लागल्या. या संकट काळात नियोजन करताना प्रशासनाची कसरत होत आहे. स्त्रीरोग, प्रसूती विभागातील शस्त्रक्रिया थांबविणे शक्य होत नाही. नाक-कान-घसा (इएनटी), नेत्ररोग (आॅपथॅम्प) येथे पाण्याचा कमी वापर असल्याने या शस्त्रक्रिया सुरू आहेत.
आता रुग्णालयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखेकडून दररोज ११ हजार लिटर पाणी टँकरद्वारे दिले जात आहे. तर शिवसेनेने एक टँकर पूर्णवेळ उपलब्ध करून दिला आहे. मात्र ही व्यवस्था अतिशय तुटपुंजी असून सर्व वार्डातील प्रसाधनगृहासाठी लागणारे पाणी, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी, डॉक्टर व कर्मचाºयांचे निवासस्थान, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थी वसतिगृहांना लागणारे पाणी याचा आकडा फार मोठा आहे.
टँकरने चार लाख लिटर क्षमतेच्या सम्पमध्ये काही हजार लिटर पाणी टाकून उपयोग होत नाही. हे पाणी सम्पच्या तळालाच जाऊन बसते. त्यामुळे मोटरद्वारे उपसा करता येत नाही. अडचणी सोडविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू आहे. रुग्णालयातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम नगरपरिषदेने अर्धवटच सोडून दिले. आता हा गाळ काढण्यासाठी पालिकेकडून पैशाची मागणी होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टंचाईत वाढ झाली.
सामाजिक जाणीवेतून दात्यांनी पुढे येण्याची गरज
शासकीय रुग्णालयात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फटका थेट रुग्णांनाच बसत आहे. या संकटाच्या काळात सामाजिक जाणीवेतून विविध घटकांनी पुढे येण्याची गरज आहे. रुग्णालयाला शक्य होईल तितक्या टँकरद्वारे पाणी दिसल्यास येथील कारभार सुरळीत होऊन रुग्णांचे जीव वाचविता येऊ शकतात. यासाठी शहरातील सामाजिक संघटनांसह विविध दात्यांनी मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जीव जात असताना बांधकामावर वारेमाप पाणी
पाण्याअभावी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या आहे. तर दुसरीकडे यवतमाळ शहरातील बांधकामावर पाण्याचा वारेमाप वापर केला जात आहे. गंभीरबाब म्हणजे भर टंचाईत नगरपरिषद व बांधकाम विभाग नवीन कामांना सुरुवात करीत आहे. एकीकडे पाण्याअभावी जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असता केवळ कंत्राटदारांचे हित जोपासणाºया यंत्रणेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. हा विरोधाभास केवळ राजकीय उदासीनतेतून निर्माण झाला आहे.

एमआयडीसीत गोखी प्रकल्पाचे पाणी रुग्णालयासाठी मोफत उपलब्ध आहे. त्यांनी टँकरद्वारे तेथून पाणी आणावे, असे निर्देश पूर्वीच दिले आहे. त्याउपरही काही अडचणी असतील तर सोडविण्यात येईल.
- चंद्रकांत जाजू
प्रभारी जिल्हाधिकारी
यवतमाळ.

रुग्णालयातील पाणीसंकट भीषण असून याचे नियोजन करताना कसरत होत आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आतापर्यंत पाण्याचे नियोजन केले. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशा संकटाच्या काळात समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Surgery jam in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.