तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात
By सुरेंद्र राऊत | Updated: November 18, 2023 19:40 IST2023-11-18T19:38:33+5:302023-11-18T19:40:54+5:30
रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी या चिमुकल्या मुलींची नावे आहेत.

तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात
हिवरी (यवतमाळ) : येथील आर्णी मार्गावर मनदेवजवळ जेतवन पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी ध्यान केंद्र असल्याने अनेक पर्यटक भेटीसाठी येतात. दिवाळीच्या सुट्यात मामाच्या घरी आलेली चिमुकली मामासह जेतवनला भेट देण्यासाठी आली. सर्व नातेवाईक जेतवन परिसराची पाहणी करत असतानाच दोन बहिणी परिसरातील तलावात बुडाल्या. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र दोघींचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.
रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी या चिमुकल्या मुलींची नावे आहेत. रिया ही काव्याची आतेबहीण आहे. काव्या मामा किशोर बिहाडे यांच्याकडे सुट्यात आली होती. आई व मामा यांच्यासोबत ती जेतवन पर्यटनस्थळी आली. तेथे ध्यान केंद्रात सर्व कुटुंब बसलेले असताना दोन चिमुकल्या बाहेरच्या परिसरात खेळत होत्या. अचानक त्या येथील तलावात पडल्या. पाण्यात मुली बुडत असल्याचे किशोर बिहाडे यांच्या लहान भावाच्या लक्षात आले. त्या मुलींना तलावाबाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. ऋषभ माहुरे, संतोष खंडागळे, अमोल चाैधरी, वैभव महेर या तरुणांनी धाव घेवून त्या चिमुकल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. दोघींनाही तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल ढोकणे, जमादार संजय राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.