तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील भोसे गावाबरोबरच घाटशिरस हे गावही कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम तंतोतंत पाळले पाहिजेत, तरच कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले. यावेळी त्यांनी दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे कौतुक केले.
घाटशिरस ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, सरपंच गणेश पालवे, उपसरपंच पोपटराव चोथे, कामगार तलाठी नरहरी साळुंके, ग्रामसेविका सुवर्ण भापकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक यावेळी उपस्थित होते. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हॉटस्पॉट ठरलेले घाटशिरस गावाचे सरपंच गणेश पालवे, उपसरपंच चोथे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व नागरिकांनी राजकारण बाजूला ठेवत शासनाने घालून दिलेले सर्व नियम तंतोतंत पाळले. सर्वप्रथम रॅपिड अँटिजन चाचणीस सुरुवात केली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांच्या आढावा बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच ऑक्सिजन पातळी तपासणी यंत्र ग्रामपंचायतीमार्फत खरेदी करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासणी केली. बाधित लोकांना तिसगाव, पाथर्डी येथील विलगीकरण कक्षांमध्ये पाठविले.
यावेळी सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, युवा नेते अशोक टेमकर यांच्याशी संवाद साधला. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे गाव जरी कोरोनामुक्त झाले असले तरी पुन्हा कोणी कोरोनाबाधित होऊ नये, म्हणून खबरदारी घेत राहा. सातत्याने गावाबाहेर ये-जा करणाऱ्यांवर लक्ष ठेवा, असे आवाहन तहसीलदार वाडकर यांनी ग्रामस्थांना केले.