अहमदनगर : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढलेली असतानाच स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत. कोरोनामुळे रक्ताची नातीही गोठली असून कर्मचाऱ्यांनाच त्या राखेवर सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर नगर शहरात फक्त नालेगाव अमरधाममध्येच अंत्यसंस्कार केले जातात. आता काही अंत्यसंस्कार तपोवन रोड येथील सावेडी परिसरातील कचरा डेपोत केले जात आहेत.
महापालिकेच्या मार्गदर्शनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाने मयत झालेल्यांचे बहुतांश अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीमध्येच होतात. गत महिन्यात एकाच दिवशी ४० ते ५० अंत्यसंस्कार लाकडावर करण्यात आले होते.
कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बरेच नातेवाईक फक्त अस्थी घेऊन घेतात. राख सहसा कोणीच नेत नाही. तसेच काही जण अस्थीही नेत नाहीत आणि राखही नेत नाहीत. त्यामुळे अमरधाममध्ये राखेचे ढीग साचलेले आहेत. ही राख पोती भरून ती नदीत सोडण्याचे कामही सध्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. भीती आणि निर्बंधामुळे अंत्यविधीला सोडाच पण मृतांची अस्थी व राख घेण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राखेची जबाबदारीही कर्मचारीच उचलत आहेत.
-------
गतवर्षीपेक्षा आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येत आहेत. पण, राख मात्र संसर्गाच्या भीतीने स्मशानभूमीतच सोडून जात आहेत. तर काही जण राखेने नदी दूषित होईल, म्हणून राख स्मशानभूमीतच ठेवत आहेत.
- एक कर्मचारी, कचरा डेपो स्मशानभूमी
-----
अमरधाम स्मशानभूमीत सर्वाधिक मयतावर अंत्यसंस्कार झाल्यावर नातेवाईक राख नेत नसल्याने राखेचे ढिगारे साचत आहेत. मोठ्या प्रमाणात पोती राखेने भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख कर्मचाऱ्यांनाच एका टेम्पोतून नदीत नेऊन टाकावी लागत आहे. ३० टक्के लोक राखही नेत नाहीत आणि अस्थीही नेत नाहीत.
- स्वप्नील कुऱ्हे, व्यवस्थापक, अमरधाम
------
अस्थींचे नदीत विसर्जन....
सध्या बाहेर फिरण्यावर निर्बंध असल्याने अनेक जण अस्थी घेऊन जात नाहीत. त्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जाता येत नसल्याने अडचण आहे; परंतु स्मशानभूमीमधील कर्मचारी स्वत: ती राख नदीत नेऊन टाकत आहेत. इतर स्मशानभूमीत कोणी राख नेणारे असल्यास त्यांच्याजवळ ती देण्यात येत आहे.
बाहेरगावातील कोरोनाबाधिताचे शहरात निधन झाले, तर त्याचे नातेवाईक अस्थी नेत नाहीत, अशा अस्थींच्या पोती भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख नदीत नेऊन टाकत आहोत. आतापर्यंत ५००-६०० पोती राख विसर्जित केली आहे.
-------
आता भीती गेली
सुरुवातीला लोकांना कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास भीती वाटत होती; परंतु आता कोणीच भीत नाही, असे अमरधामधील कर्मचाऱ्याने सांगितले.
डमी आहे.....