लॉकडाऊन काळातील विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी असोसिएशनचे संस्थापक चेअरमन कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विभुती प्रसाद, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, राज्य सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.
अजित जगताप यांनी सुरुवातीलाच कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर करीत असलेल्या प्रभावी उपाययोजना व रुग्णसंख्येत झालेली घट याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील मोबाइल रिटेलर्सनी ब्रेक द चेन निर्बंधांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिशय जबाबदारीपूर्वक नियमावलीचे पालन केल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. विभुती प्रसाद यांनी मोबाइल रिटेलर्सच्या समस्या मांडताना सांगितले की, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करताना सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक विदेशी कंपन्या मोबाइल तसेच इतर वस्तूंची सर्रास विक्री करत आहेत. यामुळे रिटेलर्सचे मोठं नुकसान होत असून, सरकारने याबाबतीत कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाची माहिती घेऊन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच विक्रेत्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भावेश सोळंकी यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून वेळ देत असोसिएशनच्या समस्यांची आस्थेवाईकपणे नोंद घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले. (वा.प्र.)