अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू असताना महापालिकेच्या माहिती सुविधा केंद्रात सोमवारी मृत्यूचे दाखले घेण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. एकाचवेळी नागरिकांनी दाखले घेण्यासाठी गर्दी केल्याने काहीवेळ गोंधळ उडाला होता. महापालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली गेल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेने शहरात कठोर निर्बंध लागू केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. दुसरीकडे महापालिकेच्याच कार्यालयात निमयांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुन्या महापालिका कार्यालयासमोर असलेल्या माहिती सुविधा कार्यालयाबाहेर दाखले घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मृत्यूचे दाखले घेण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक आलेले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांवर महापालिकेमार्फत मोफत अंत्यविधी केले जातात. मृत्यूचे दाखले महापालिकेतच मिळतात. त्यामुळे दाखले घेणाऱ्यांची गर्दी अचानक वाढली असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
....
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद महापालिकेत
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर महापालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे मृत्यूचे दाखले संबंधित व्यक्तीच्या ग्रामपंचायतीत मिळत नसून, ते महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्हाभरातून नागरिकांचे फोन येतात. मृत्यूचा दाखला कुठे मिळतो, याची अनेकांना माहिती नाही. नातेवाइकांनी महापालिकेच्या माहिती सुविधा कार्यालयात येऊन दाखले घेऊन जावेत, असे आवाहन सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी केले आहे.