याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील नेहरू मार्केट, फेज टू, तपोवन रास्ता, भिस्तबग रस्ता हे कधी पूर्ण होतील याविषयी कोणालाही, काहीही सांगता येणार नाही. कदाचित या प्रश्नावर आणखी दोन निवडणुका होऊन जातील तरी हे प्रश्न जागेवरच राहतील. नगर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे उपनगरात तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतीमध्ये प्रामुख्याने रस्त्यांची समस्या फार मोठी आहे. उपनगरातील काही रस्ते होऊन १०, १५ वर्षे झालेली आहेत. ते आता मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले आहेत. ते रस्ते नव्याने पुन्हा करणे गरजेचे असले तरी त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हातात घेऊ नयेत. तथापि, त्या सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून जेथे मोठे खड्डे पडले आहेत, त्यांचे चांगल्या प्रकारे पॅचिग पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावे त्यासाठी आवश्यक ती योग्य प्रमाणात खडी व डांबर याचा वापर करण्याची गरज आहे. केवळ खड्डे मुरमाने भरले तर ते एक पावसात उघडण्याची शक्यता आहे.
उपनगरातील छोटे, मोठे नाले, गटारी यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथ रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना पावसाळ्यात अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागते. उपनगरात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर, पाणीपट्टी दरवर्षी महापालिकेला नियमित भरत आहेत, याचा विचार करावा, असे शितोळे यांनी म्हटले आहे.