अहमदनगर : कठोर निर्बंध लागू करत महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविल्याचा परिणाम दिसू लागला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशीही घटली आहे. त्यामुळे शहराचा पॉझिटिव्ह रेट १० टक्के इतका खाली आला आहे. तो शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.
गेल्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून येत होते. रुग्णसंख्या एक हजार पार गेली होती. कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान महापालिकेसमोर होते. आयुक्त शंकर गोरे यांनी रस्त्यावर उतरून परंतु, गेल्या महिनाभरात शहरातील रुग्णसंख्या घटली असून, सोमवारी नगरमध्ये ८३ रुग्ण आढळून आले. याविषयी आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क साधला असता गोरे म्हणाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. ही संख्या आता कमी झाली आहे. शहरात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध आणि चाचण्यांमध्ये झालेली वाढ, यामुळेच हे शक्य झाले. ही संख्या शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. नियमांचे कडक पालन व्हावे, यासाठी दक्षता पथक स्थापन केले. हे पथक सकाळी व संध्याकाळी, अशा दोन वेळा शहरात फिरत असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसला. त्याचरोबर रस्त्यावर चाचणी केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या घटली. मागील महिन्यांत संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. ते कमी झाले. गर्दीतून संसर्ग होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण आणले. तसेच चाचण्यांची संख्या वाढविली. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ज्या भागात रुग्ण सापडतील, अशा भागातील सर्व नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे वेळेवर उपचार होऊन संसर्ग कमी होण्यास मदत होत आहे. ज्या आस्थापना सुरू आहेत, अशा आस्थापनांमधील मालकासह कामगारांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळेही चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत झाली असून, दुकानांतून संसर्ग हाेण्याची भीती यामुळे काही अंशी कमी झाली आहे, असे आयुक्त गोरे म्हणाले.
....
दररोज २५०० चाचण्या
कठोर निर्बंध लागू करत चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. महापालिकेसह खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज २४०० ते २५०० चाचण्या होत आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. चाचण्या वाढविल्याने प्रसार कमी होण्यास मदत होत असून, यापुढे चाचण्यांवर भर दिला जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
...
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची फोनद्वारे विचारपूस
नगर शहरात घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना दिवसातून दोनवेळा फोन केला जातो. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. या संस्थेचे कर्मचारी दररोज फोन करून रुग्णांची विचारपूस करत असल्याचे सांगण्यात आले.
...