लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या असंघटित कामगारांचा समावेश घनकचरा व्यवस्थापनात करावा, अशी मागणी विकास उडाणशिवे यांनी केली आहे.
महापालिकेत स्वच्छ भारत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात शहरातील असंघटित कचरावेचक सहभागी झाले होते. यावेळी कचरावेचक ज्योती शिंदे, शीतल शिंदे, मीना चांदणे, वनिता घोरपडे, लक्ष्मी भालेकर, मंगल घोरपडे, दीपाली घोरपडे, रेखा साळवे, संगीता गाडे, मालन वाघमारे, शोभा बोरडे, सुशीला रणदिवे, दीपाली कांबळे, गयाबाई चांदणे, सुभद्रा साळवे आदींची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या कामगारांना ओळखपत्र देण्यात आले, तसेच १८० सभासदांना कौशल्य भारत विकास योजनेंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे, तसेच आरोग्यासंबंधित प्राथमिक माहिती देऊन ३ वर्षांचे अपघात विमा संरक्षण शासनामार्फत देण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उडाणशिवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याने कचरा गोळा करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम करीत आहे. सध्या कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक जिल्ह्यांत कचरावेचकांचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून घेण्यात आला आहे. त्याचा आधार घेत मनपानेही येथील काच, कचरावेचकांचा समावेश करून घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे विकास उडाणशिवे यांनी सांगितले.