अहमदनगर : बाजार समितीच्या धोरणात राज्य सरकारने बदल केल्याचा परिणाम भाजी बाजारात तेजी होण्यात झाला आहे. भाज्यांच्या किमती अडीच पटीने वाढल्या आहेत. भाजी बाजाराच्या अस्थिर धोरणाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसल्याने ग्राहकांची मनमानी लूट सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या बाजार समितीबाबत धोरणात बदल झाल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून आडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. तो बंद बुधवारी सायंकाळी मागे घेण्यात आला असला तरी चार दिवसांच्या बंदचा थेट परिणाम भाज्यांचे भाव वाढण्यात झाला. दोन-तीन दिवसातच भाज्यांच्या भावात अडीच ते तीन पट वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. बाजारात बटाट्याची आवक घटल्याने बटाटा २० रुपयावरून थेट ४० रुपयापर्यंत वाढला आहे. अद्रकच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. अद्रक ४० रुपयावरून ८० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. मिरचीच्या भावात वाढ होऊन ती ८० रुपयांवरून थेट १६० रुपये इतकी झाली आहे. लसूण १०० रुपयावरून १५० रुपयांपर्यंत, तर टोमॅटो २५ रुपयांवरून ६० रुपये झाला आहे.
मिरचीचा ठसका १६० रुपये किलो!
By admin | Published: July 14, 2016 1:23 AM