अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा प्रथमच एकवीस कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेतील विविध उपक्रमांची निवड करून हा कार्यक्रम आखण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांत तो राबविला जाणार आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेलाही आता अच्छे दिन येणार असल्याचे बोलले जात आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्येत दरवर्षी कमालीची घट होत आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थी पाठ फिरवितात़ खासगी शाळेला त्यांची पसंती असते़ खासगी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामुळे खासगी शाळांना चांगले दिवस आहेत़ याउलट स्थिती जिल्हा परिषदेच्या शाळांची आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत असल्याने शिक्षकही अतिरिक्त ठरत आहेत़ शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, शाळा ओस पडत आहेत़ यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढकार घेतला असून, त्यांनी जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांची पाहणी केली़ त्यांनी ३० शाळांना भेटी देऊन उपक्रमांची माहिती घेतली़ काही शाळेत स्तुत्य, असे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ हे उपक्रम इतर शाळेत राबविण्यासाठी त्यांनी ४० शिक्षकांचा एक अभ्यास गट तयार केला़ या अभ्यास गटाने विविध उपक्रम सादर केले़ सादर केलेल्या २१ कार्यक्रमांची निवड करण्याचे एकत्रित बैठकीत ठरले़ निवडक कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीनेही हिरवा कंदील दाखविला असून, हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६६ शाळेत राबविण्याच्या सूचना नवाल यांनी दिल्या आहेत़ या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा निश्चित फायदा होईल़ प्रत्येक शाळेत समान कार्यक्रम राबविण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, शिक्षक हा कार्यक्रम कसा राबवितात, याकडे आता लक्ष असेल. (प्रतिनिधी) काय आहे उपक्रम शैक्षणिक वर्षे २०१४- १५ साठीच्या नियोजनात २१ कलमी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे़ शाळा व्यवस्थापनांना कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे़ दिपस्तंभ मार्गदर्शिका प्राथमिक शाळांना वितरित करण्यात आल्या आहेत़ त्यात वर्षभरात राबवायच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली असून, हे कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबविले जाणार आहेत. हे उपक्रम राबविले किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे़ उपक्रमांचा विद्यार्थ्यांना किती फायदा झाला, यासाठी येत्या जुलैमध्ये विद्यार्थ्यांची बुध्दीमापन तपासणीही जिल्हा परिषदेच्या वतीने केली जाणार आहे़
जिल्हा परिषदेच्या शाळेत २१ कलमी कार्यक्रम
By admin | Published: May 30, 2014 1:04 AM