अहमदनगर : १९७२ पासून जिल्हा परिषदेने बांधलेल्या पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापूर बंधाऱ्यापैकी ३६४ बंधारे नादुरूस्त आहेत. या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी जि.प.ला ३२ कोटी रुपयांची गरज आहे. राज्य सरकार जलयुक्त शिवार योजनेवर भर देत असल्याने जि.प.च्या बंधारे दुरूस्तीसाठी निधी कसा उपलब्ध करावा, असा प्रश्न जि.प. समोर आहे. यामुळे पावसाळ्यात या नादुरुस्त बंधाऱ्यात साठलेले पाणी वाया जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाच्यावतीने स्वतंत्रपणे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत बंधारे बांधण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषदेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षात निधी अभावी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाची दुरवस्था झालेली आहे. अलीकडच्या काही वर्षात निधी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या संख्येने बंधाऱ्यांची कामे हाती घेता आलेली नाही. दुसरीकडे वर्षानुवर्षे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बंधाऱ्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेने मागणी करूनही सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. सरकारने गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना सुरू केलेली आहे. या योजनेत ते कृषी विभागा मार्फत नव्याने बंधारे बांधत आहेत. यंदा या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या ३२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावण्यात आलेली आहे. यावरून महसूल विरोधात जिल्हा परिषद असा बराच वाद पेटला होता. अखेर त्यात जिल्हा परिषद सदस्यांनी नादुरुस्त बंधारे सुचवण्यास सांगण्यात आलेले आहे. मात्र, त्या बंधाऱ्यांची निवड जलयुक्तमध्ये होईल की नाही, याबाबत सदस्य आणि पदाधिकारी साशंक आहेत. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनकडे बंधारे दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, नियोजन समितीत तरतूद नसल्याने बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होवू शकलेला नाही.
३६४ नादुरूस्त बंधाऱ्यांना हवाय ३२ कोटींचा निधी
By admin | Published: April 23, 2016 11:34 PM