शिर्डी : साईबाबांचे निस्सीम भक्त म्हणून परिचित असलेले भरूच (गुजरात) येथील साईराम गुरुजी हे साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे भरोज ते शिर्डी असा ५६० किलोमीटरचा पायी प्रवास चक्क उलटा करीत आहेत.साईराम गुरूजी यांनी साईबाबांच्या वेशात व हुबेहूब पेहराव करून भरूच ते शिर्डी असा उलटा पायी प्रवास करून शिर्डीत आगमन केले. शिर्डीत आल्यावर त्यांनी साई समाधी, गुरुस्थान, द्वारकामाईत जावून दर्शन घेवून सुलटा प्रवास सुरू केला. साईदशर्नानंतर साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना साईराम गुरुजी म्हणाले, सलग ४१ वर्षांपासून रामनवमी, दसरा, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा अशा सार्इंच्या चार उत्सवांना भरूच ते शिर्डी असा उलटा पायी ५६० किलोमीटरचा प्रवास करून साईदर्शन घेतो. उलटा प्रवास करण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, समाजामध्ये सरळ चालणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची परंपरा आहे. त्यामुळे उलटे चालल्यावर समाजाचे लक्ष वेधले जाते. त्यासाठीच आपण हा मार्ग स्वीकारून समाजात सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी, हा हेतू या मागचा असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी आपण शिर्डीप्रमाणेच आयोध्या, हरिद्वार, पशुपतीनाथ, अजमेर, पंजाब, नर्मदा परिक्रमा आदी ठिकाणी पायी उलटा प्रवास करून तीर्थयात्रा केली आहे. आपण भरूच येथे मिनी शिर्डी तीर्थधाम नावाचा आश्रम चालवत असून दररोज सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत भिक्षा मागून आश्रमात अन्नदानाचे अखंडपणे काम करत आहोत. तसेच समाजाला व्यसनापासून दूर करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)शंकराचार्य हे साईबाबांविषयी वारंवार वादग्रस्त विधाने करून एकप्रकारे वेदांचाच अपमान करीत आहेत. शंकराचार्य जर स्वत:ला देव समजत असतील तर त्यांनी देशातील दुष्काळ दूर करून दाखवावा, असे आपले खुले आव्हान असून ते त्यांनी स्वीकारावे. साधुसंतांचा अपमान करणे हे घोर पाप आहे.- साईराम महाराज, भरूच (गुजरात)
५६० किलोमीटरचा पायी उलटा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 10:55 PM