अकोले : घाटघर-रतनवाडीसह हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचे तांडव थंडावले असले तरी पाऊस सरींचा हिंदोळा सुरू आहे. बुधवारी दिवसभर तालुक्यात सर्वदूर घननिळे आभाळ होते. काही ठिकाणी सायंकाळी दमदार सरी बरसल्या. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ४७० दशलक्ष घनफूट इतका झाला होता.तालुक्यातील पूर्व व पठार भागात शेतजमीन वापशाची वाट पाहावी लागत असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़ पश्चिम घाटमाथ्यावर भात आवणीची लगबग वाढली आहे. मंगळवारी पडलेल्या पावसाची बुधवारी सकाळी झालेली नोंद कंसात यंदाचा एकूण पाऊस :-भंडारदरा-४८ (७२४), घाटघर- ५० (१ हजार ५३५), रतनवाडी- ८८ (१ हजार ६१३), पांजरे-९६ (१ हजार ११७), वाकी-८७ (८९७), निळवंडे-५(३१९), अकोले-२५ (४१०), कोतूळ- ९ (२७०), आढळा-२ (१३३) मिलीमिटर. पिंपळगाव खांड येथे मुळा नदीचा १० हजार ३४२ क्युसेक इतका विसर्ग होता. आंबित, बलठण, पिंपळगाव खांड, देवहंडी, कोथळे, वाकी, टिटवी,पाडोशी, सांगवी, घोटी-शिळवंडी, बदगी बेलापूर, येसरठाव हे लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. अकोले शहर व निळवंडे धरण क्षेत्रातही दिवसभर दमदार सरींचा कोसळल्या असून भंडारदरा धरणा बरोबरच निळवंडेच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळचा पाणीसाठा : भंडारदरा-५ हजार ४७०, निळवंडे- २ हजार २१३, आढळा- २९२ दशलक्ष घनफूट़ (तालुका प्रतिनिधी)
भंडारदरा @५०
By admin | Published: July 14, 2016 1:22 AM