विनोद गोळे, पारनेर पारनेर तालुक्यातील कान्हूरपठारसह सोळा गावांसाठीची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुमारे वीस कोटी रूपये खर्चुनही बंदच आहे. त्यामुळे शासनाचा केवळ तीन गावांसाठी टँकरवर दर महिन्याला पाच ते सात लाख रूपयांचा खर्च होतो. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने ही योजना स्वत:कडे हस्तांतरीत करून घेतलेली नाही. चार वर्षांपूर्वी कान्हूरपठारसह पिंपळगाव रोठा, नांदूरपठार, पिंप्री पठार, वेसदरे, पुणेवाडी, विरोली, किन्ही, करंदी या गावांसह परिसरातील गावांना मांडओहोळ धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रादेशिक नळयोजना करण्यात आली. कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. आॅगस्ट २०१० मध्ये योजना चालू करण्यात आली. मात्र नंतर संबंधित ग्रामपंचायती पाणीपट्टी भरत नसल्याने योजनेचे सुमारे चोपन्न लाख रूपयाचे वीजबिल थकले होते. नंतरच्या काळात शासन निधी व आमदार विजय औटी यांच्या निधीतून वीजबिल भरण्यात आले. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या काळात दुष्काळात योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न झाला परंतु नंतर योजना बंद पडली. योजनेवर आतापर्यंत सुमारे एकोणीस कोटी रूपये खर्च झाले आहेत. खर्चावरील तफावत १६ गावांच्या कान्हूरपठार नळयोजना सुरु झाल्यानंतर पाणी, वीजबिल व कर्मचारी यांच्यावरील हिशोब केल्यास दर महिन्याला सुमारे नऊ ते दहा लाख खर्च येईल, असे जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. ही एक बाजू झाली. त्यानंतर ‘लोकमत’ ने पंचायत समिती व इतर संबंधित कार्यालयाकडे टँकरविषयी माहिती घेतली असता कान्हूरपठार परिसराला दोन टँकर व पाच खेपा, पुणेवाडीला सहा खेपा व वेसदरेला दीड खेपा असा टँकरने पाणीपुरवठा चालू असून यासाठी एका टँकरला किंवा त्या गावासाठी होणार्या खेपेला तीन हजार रूपये रोज खर्च येतो, असे सांगण्यात आले. म्हणजेच कान्हूरपठार, पुणेवाडी, वेसदरे या तीन गावांनाच टँकरसाठी टंचाईच्या काळात सुमारे पाच ते सात लाख रूपये खर्च होणार आहेत. तसेच याच नळ योजनेतील विरोली, करंदी, नांदूर पठार, कारेगाव, पिंपळगाव रोठा ही गावे टँकरची मागणी करू शकतात मग याच पाच ते सहा गावांचा पुन्हा निव्वळ टँकरवर दहा ते पंधरा लाख रूपये खर्च होणार आहे. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकार्यांना ही तफावत निदर्शनास आणून दिल्यास टँकरवर होणारा शासनाचा लाखो रूपये खर्च वाचेल शिवाय नागरिकांना घरासमोर नळाला पाणीपुरवठा होईल. प्रादेशिक नळयोजना कायमस्वरुपी सुरु रहाणे अशक्य आहे. मात्र जानेवारी ते जून या पाणी टंचाईकाळात पाणी योजना सुरु होणे आवश्यक आहे. योजनेचे वीज बिल व दुरुस्ती खर्च टंचाई निधीतून घ्यावा. यामुळे कान्हूरपठारसह सोळा गावांचा टँकरसाठी होणारा वीस ते पंचवीस लाखाचा खर्च वाचण्यास मदत होईल, असा या गावांमधील नागरिकांचा एकूण सूर आहे. योजना सुरू होईल कान्हूरपठारसह १६ गावांच्या नळ योजनेवर सव्वा एकोणीस कोटी रूपये खर्च झाला असून योजना सुरळीत होण्यासाठी दुरूस्ती खर्च अंदाजे पंधरा लाख व वीजबिल व इतर खर्च मिळून महिन्याला नऊ लाख खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही योजना हस्तांतरीत झालेली नाही. नितीन कुलकर्णी, उपअभियंता,जीवन प्राधिकरण,नगर योजना चांगली कान्हूरपठारसह सोळा गावांच्या नळ योजनेचा चांगला वापर होणे आवश्यक आहे. योजना चांगली आहे. पिंपळगाव रोठा येथे शुध्दीकरण प्लँट चांगला आहे. फक्त योजना चालू होऊन वापर झाला पाहिजे. पांडुरंग गायकवाड , अध्यक्ष, कोरठण खंडोबा देवस्थान
नळ योजनेवरील वीस कोटी पाण्यात
By admin | Published: May 30, 2014 1:10 AM