श्रीगोंदा : विसापूर तलाव लाभक्षेत्रातील पाच ते सहा गावांमधील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शुक्रवारी गावे बंद व गेटतोडोचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारपासून कुकडीचे आवर्तन विसापूर मध्ये सोडण्याचे आदेश दिले. यासंदर्भात कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, घारगाव, चिंभळे, शिरसगाव, पिसोरे या गावांमधील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र कुकडीचे आवर्तन ‘टेल टु हेड’ अशा पध्दतीने चालू असल्याने विसापूर आवर्तन आणखी पाच दिवस सुटणे अवघड होते. भाजपाचे कार्यकर्ते ज्ञानदेव हिरवे, रमेश गायकवाड राजेंद्र काकडे, बंडू काकडे, महेंद्र गायकवाड यांनी मंगळवारी श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत बुधवारपासून विसापूरचे आवर्तन सोडावे अन्यथा आम्ही शुक्रवारी गावे बंद ठेवून कुकडीचे गेटतोडो आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. यावर पाचपुते यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. (तालुका प्रतिनिधी)
विसापूर तलावात कुकडीचे आवर्तन
By admin | Published: August 17, 2016 12:31 AM