कोतूळ : मुळा नदीला आलेल्या पुरामुळे चास येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने नदीच्या पलीकडे शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकरी नामदेव शांताराम शेळके हे मंगळवारी वाहून गेले़ चास येथे मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (के.टी़ वेअर) आहे़ दुपारी एकच्या दरम्यान चास येथील नामदेव शेळके हे बंधारा ओलांडून पलीकडे असलेल्या आपल्या शेताकडे जात होते़ पुरामुळे भराव वाहून गेलेला आहे़ त्यावरून जात असताना त्यांचा तोल जाऊन ते मुळा नदी पात्रात पडले़ नदीत यावेळी दहा हजार क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाणी वाहत होते़ त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु ते येवू शकले नाही़ ही घटना काही अंतरावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाहिली़ शेतकरी धावत येईपर्यंत नामदेव शेळके वाहत गेले होते़ घटनास्थळी तहसीलदार मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राठोड तर पोलीस निरीक्षक नारायण वाखारे, उपनिरीक्षक दिलीप बेंद्रे,सुनील साळवे, सोमनाथ कुंढारे, जि .प. सदस्य सुरेश शेळके, कैलास शेळके, डॉ़ सुभाष गोडसे, विकास गोडसे, सुभाष नाना गोडसे, अर्जुन गावडे यांच्या सहकार्याने शोधकार्य सुरु होते.(वार्ताहर)
मुळा नदीत शेतकरी वाहून गेला
By admin | Published: August 10, 2016 12:02 AM